मुंबई : राज्यात सतत वातावरणात बदल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातीलकाही भागात अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. यातच राज्यात पुढील चार ते पाच दिवस सौम्य थंडी जाणवणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात थंडीची लाट 2 फेब्रुवारीपर्यंत कायम राहणार आहे. मध्य महाराष्ट्रात थंडीच्या लाटेसारखी परिस्थिती असणार आहे. तर मुंबईत किमान तापमान सरासरीपेक्षा कमी होऊ शकते, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले होते.
पुढील काही दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता देखील वर्तवली होती. तसेच किमान तापमानात किरकोळ वाढ होईल. परंतु, दिवसाच्या तापमानात अंशत: घट होण्याची शक्यता आहे.राज्यातील मराठवाडा आणि विदर्भात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे.
आधीच वाढत्या थंडीचा पिकांवर परिणाम होत आहे. त्यात पुन्हा पाऊस आला तर पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा होऊ शकतो. नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर तालुक्यातील काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.