सातारा – घरात घरगुती वाद झाल्याच्या घटनेनंतर आता आपल्यानंतर आपल्या मुलांचा कोणी सांभाळ करणार नसल्याची भावना झाल्याने पोटच्या मुलांचा खून करणाऱ्या पित्याला जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एस.जाधव यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. चंद्रकांत अशोक मोहिते (मुळ रा. रासाटी, ता.पाटण, रा. घाटकोपर,ु मुंबई) असे शिक्षा लागलेल्या आरोपीचे नाव आहे.
या खटल्याची हकीकत अशी, चंद्रकांत हा मुळचा पाटण तालुक्यातील रासाटी या गावचा रहिवाशी असून तो चालक असल्याने घाटकोपर येथे वास्तव्यास होता. घरगुती वादाच्या घटनेनंतर आता आपल्यानंतर आपल्या दोन्ही मुलांचा सांभाळ करण्यासाठी कोणी पुढे येणार नसल्याची त्याची भावना झाली होती. त्यामुळे त्याने दि. 9 ऑक्टोंबर 2021 रोजी त्याच्याकडील स्विफ्ट (एम. एच. 01 बीटी 8722) मधून मुलगा प्रतिक (वय 7), मुलगी गौरवी (वय 11) यांना फसवून आणले. त्याची गाडी शिरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत आल्यावर त्याने खंडाळा येथील ए.सी.जी कॅप्सूल या कंपनीजवळ गाडी थांबवली. मुलांना गाडीतून खाली उतरवून गौरवीला रस्त्यावर आपटून तर प्रतिकचा गळा दाबून त्यांचा खून केला व मृतदेह गाडीच्या डिग्गीत टाकून तो साताऱ्याच्या दिशेने निघाला होता.
दरम्यान त्याची गाडी आनेवाडी टोलनाक्यावर आली असता तिथल्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात हा प्रकार आल्याने त्यांनी त्याबाबत पोलिसांना माहिती दिल्यावर मोहितेला ताब्यात घेण्यात आले होते. पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केल्यावर पत्नीसोबत वाद असल्याने माझ्यानंतर ती मुलांना सांभाळणार नसल्याने त्यांचा खून केल्याची कबुली त्याने दिल्यावर त्याला अटक करण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास करून तत्कालीन पोलीस निरीक्षक उमेश हजारे यांनी मोहितेविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
या गुन्ह्याची सुनावणी सुरू असताना सरकारी वकील सुरेखा क्षीरसागर, फिरोज शेख, गौरी लकडे यांनी 19 साक्षीदार तपासले. साक्षीदारांच्या साक्षी व समोर आलेल्या पुराव्यावरून जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. जाधव यांनी आरोपी मोहिते याला जन्मठेप व दहा हजार रूपये दंड तसेच दंड न दिल्यास सहा महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावली. या खटल्यात फलटणचे पोलीस उपअधिक्षक तानाजी बरडे, तत्कालीन पोलीस निरीक्षक उमेश हजारे, नवनाथ मदने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सतीश पवार तसेच प्रॉसिक्यूशन स्कॉडकडून पोलीस उपनिरीक्षक अनिल धनवडे, हवालदार शमशुद्दीन शेख, गजानन फरांदे, मन्सूर मणेर, राजेंद्र कुंभार, अमित भरते, रेहनाबी शेख, अश्विनी घोरपडे यांनी काम पाहिले.