पुणे – पुणे-बंगळुरू बाह्यवळण महामार्गावरील नवले पूल परिसरात सातत्याने अपघात घडत आहेत. हा परिसर कायमचा अपघातमुक्त करण्यासाठी या ठिकाणी काही सुधारणा करणे गरजेचे आहे. या रस्त्याशी एनएचएआय, पुणे महापालिका, एमएसईबी, एमएनजीएल आणि पीएमआरडीए अशा एकापेक्षा जास्त संस्था संबंधित आहेत. या सर्व संस्थांची एकत्र बैठक घेऊन तातडीने या प्रश्नावर तोडगा काढावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी आज केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने या संस्थांची एकत्रितपणे बैठक बोलवावी, असे त्या म्हणाल्या.
गेल्या महिन्यात झालेल्या भीषण अपघातानंतर खासदार सुळे यांनी लागलीच या ठिकाणी भेट देऊन पाहणी करत जखमींची विचारपूस केली होती. त्यानंतर संसदेच्या अधिवेशनातही याबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केला. दिल्लीहून पुण्यात येताच आज पुन्हा एकदा त्यांनी नवले पूल परिसरास भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी त्या पत्रकारांशी बोलत होत्या. नवले पुलासंदर्भात एनएचएआय, महापालिका आणि महावितरणची लवकरच संयुक्त बैठक घेण्यात येणार असून, या बैठकीत याबाबतच्या तांत्रिक अडचणी सोडविण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. हा परिसर कायमचा अपघातमुक्त करण्यावर आमचा भर आहे. यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेही सहकार्य करीत आहेत.