पिंपरी, दि. 22 – घरगुती कचऱ्याचे 85 ते 90 टक्के विलगीकरण होत असून औद्योगिक कंपन्यांनी त्यांच्या आवारातील अघातक कचऱ्याचे ओला व सुका असे विलगीकरण केल्यास ते महापालिका संकलित करेल. कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी सर्व औद्योगिक कंपन्यांनी उद्योगनगरीला देशातील सर्वात स्वच्छ व सुंदर शहर बनविण्यासाठी पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी केले.
महापालिकेच्या क क्षेत्रीय कार्यालयामध्ये शहरातील औद्योगिक क्षेत्रातील घनकचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगाने पिंपरी-चिंचवड महापालिका, मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स, लघुउद्योजक संघटनांचे पदाधिकारी तसेच एमआयडीसीमधील उद्योजक यांच्यासमवेत अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय बैठक पार पडली. त्यावेळी उपस्थित औद्योगिक कंपन्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना बोलत होते. या बैठकीस आरोग्य विभागाचे उपआयुक्त अजय चारठाणकर, क क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे, पर्यावरण विभागाचे सहशहर अभियंता संजय कुलकर्णी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी किरण हसबनीस, मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सचे दिपक करंदीकर, पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, उपाध्यक्ष विनोद नाणेकर, सचिव जयंत कड, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, सहायक आरोग्याधिकारी तानाजी दाते उपस्थित होते.
जितेंद्र वाघ म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहराने स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये सहभाग घेतला आहे. त्याअनुषंगाने महापालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. कचऱ्यापासून वीजनिर्मिती (वेस्ट टू एनर्जी) हा उपक्रम महापालिकेने हाती घेतला. निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे विलगीकरण करून योग्य व्यवस्थापन आवश्यक आहे. त्याअनुषंगाने पालिकेची स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे. औद्योगिक क्षेत्रातील कचऱ्याचे योग्य विलगीकरण होत नसून काही कंपन्या त्यांच्या आवारात निर्माण होणारा कचरा रस्त्यावर किंवा इतरत्र टाकतात. त्यामुळे कचरा संकलन करण्यास अनेक अडचणी येतात. तसेच मिश्र कचरा जाळल्यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन आवश्यक आहे. यासाठी प्रत्येकाने आपली भूमिका आणि जबाबदारी समजून घेऊन त्यादृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे.
औद्योगिक कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करावे – संजय कुलकर्णी
उपआयुक्त अजय चारठाणकर म्हणाले, कचरा विलगीकरण न केल्यामुळे पर्यावरणावर त्याचा घातक परिणाम होतो. परिणामी, त्याचा मानव तसेच प्राण्यांच्या आरोग्यावर देखील परिणाम होतो. घरगुती कचरा विलगीकरणासाठी नागरिकांचा सकारात्मक आणि चांगला प्रतिसाद मिळत असून औद्योगिक कंपन्यांकडून देखील सकारात्मक प्रतिसाद अपेक्षित आहे. तसेच, सहशहर अभियंता संजय कुलकर्णी म्हणाले, शहराच्या विकासात औद्योगिक कंपन्यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. परंतु, औद्योगिक क्षेत्रात निर्माण होणाऱ्या कचऱ्यामुळे प्रदूषणात वाढ होत आहे. पर्यावरणावर होणारा दुष्परिणाम टाळण्यासाठी औद्योगिक आस्थापनांमध्ये निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.