सातारा – आपला पक्ष सर्वात मोठा असून तो आणखी वाढवायचा आहे. तो संख्येने नाही तर लिडरनी. मला हार- तुरे नकोत, प्रभावी काम करुन दाखवा. विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्रच होण्याची शक्यता असून त्यासाठी तयार राहा,’ असा सल्ला भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी दिला.
येथे भाजप कार्यालयात महिला पदाधिकारी मेळाव्यात सौ. वाघ बोलत होत्या. यावेळी सुवर्णा पाटील, सुनीशा शहा, जिल्हाध्यक्ष सुरभी भोसले, अर्चना देशमुख, गीता लोखंडे, शहराध्यक्ष विकास गोसावी, विठ्ठल बलशेटवार आदी उपस्थित होते. चित्रा वाघ म्हणाल्या, “”भाजप पक्ष लुंगा-सुंगा नाही.
या पक्षासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तासनतास काम करतात. आपण पक्षाची जबाबदारी घेतली आहे, त्या पदाला न्याय दिला पाहिजे. मंडल अध्यक्ष सक्षम झाले पाहिजेत. राजकारणात मी म्हणणारे टिकत नाहीत, तर आम्ही म्हणणारे राहतात. पक्षाचे काम आव्हानात्मक असले तरी आपली जबाबदारी कमी होत नाही. आता तर आपलं सरकार असल्याने जबाबदारी हजारपटीने वाढली आहे.” आपले सरकार कोणाला पाठिशी घालत नाही.
महिलांच्या सुरक्षेला सरकार प्राधान्य देत आहे. जिल्ह्यात कोठे चुकीचे काय झाले तर कोणाच्या फोनची वाट पाहू नका. तेथे त्वरित जाऊन पोहोचा. त्या कुटुंबाची भेट घ्या. पोलिस ठाण्यात जाऊन कलमे कोणती लावलीत त्याचीही माहिती घ्या. कारण महिलेवर अत्याचार झाला तर तो तिच्या शरीरावर होत नाही. संपूर्ण आयुष्यावर होतो. महिलांना भावनिक आधार द्या. तिची मैत्रीणही बना, असे आवाहन त्यांनी केले. राजकारणात शॉर्टकट नाही. तो शिकण्यासाठी कोणता क्लासही नसतो. राजकारण बघूनच शिकायचे असते. राजकारणाकडे प्रोफेशनल म्हणून पाहा. पक्षाच्या बैठका घ्या. लोकांच्या समस्यांचे विषय घेऊन तेही सोडवा. पद घेतले त्याला काम करुन न्याय द्यावा, असे आवाहन चित्रा वाघ यांनी केले.