भारत-बांगला मैत्री वाढविण्याचा निर्धार
नवी दिल्ली, दि. 7 – भारत व बांगलादेश यांच्यातील उच्च पातळीवरील वाटाघाटींत परस्परातील मैत्री वाढविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
बांगलादेशातील ऑगस्टमध्ये झालेल्या उठावानंतर प्रथमच झालेल्या या वाटाघाटींत परस्परांशी निगडीत असलेल्या महत्त्वाच्या प्रश्नांवर ऊहापोह करण्यात आला. वाटाघाटी मैत्रीच्या वातावरणात झाल्या. आज त्या संपल्या उद्या बांगलादेशाचे शिष्टमंडळ डाक्क्याला रवाना होत आहे.
अधिक धान्य पिकवा आणि लोकसंख्या रोखा
नवी दिल्ली, दि. 7 – अधिक धान्य पिकवून मुले अधिक होणाऱ्या गटांना भरपूर खायला घातल्यास लोकसंख्या वाढीचा वेग कमी होईल, असा नवा सिद्धांत जागतिक बॅंकेच्या तज्ज्ञांनी मांडला आहे. गेली काही वर्षे या तज्ज्ञांनी केलेल्या पाहणीत त्यांना हे आढळून आले आहे.
सकस आहार व कमी प्रजोत्पादन यांचा दृढ संबंध आहे. अन्न उत्पादन वाढ-प्रजोत्पादन हा सिद्धांत दोन्ही मार्गांनी अधिक परिणामकारक आहे. यानुसार अन्नधान्याचे उत्पन्न वाढते व लोकसंख्येलाही आळा बसतो.