भवानीनगर -ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळावी, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेले आंदोलन यशस्वी झाले आहे, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अमरसिंह कदम यांनी व्यक्त केले. यावेळी श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर पेढे वाटून हात उंचावून आनंद साजरा केला.
सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने श्री छत्रपती साखर कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर पेढे वाटून व फटाक्यांची आतिषबाजी केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला यश आल्याबद्दल ऍड. प्रशांत रुपनवर व संभाजी ब्रिगेडचे अमोल काटे यांनी अमर कदम यांचा सत्कार केला. यावेळी गणपतराव ढवाण, प्रमोद गाडे, आबासो झगडे, राजेंद्र सपकळ, मनोज घोळवे, राहुल घोळवे, विशाल भोईटे, बापूराव घाडगे, यांसह संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
कदम म्हणाले, माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी तीन डिसेंबरला चक्काजामचा इशारा दिल्यानंतर शिंदे सरकारने 29 नोव्हेंबर रोजी बैठक घेतली व या बैठकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आली. याबाबत येत्या अधिवेशनामध्ये शासन निर्णय होणार आहे.