पिंपरी, दि. 25 – शहराला जास्त दाबाने आणि सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी काही महिन्यांसाठी प्रयोग म्हणून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी 19 नोव्हेंबर 2019 ला घोषणा केली. त्याची 25 नोव्हेंबरपासून अंमलबाजवणी करण्यास सुरूवात केली. दिवसाआड पाणी पुरवठा केल्याने पाण्याच्या तक्रारी कमी येत असल्याचा दावा करत पालिका प्रशासनाकडून तीन वर्षांपासून दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. तर भविष्यातही जास्तीचे पाणी उपलब्ध झाले तरी शहराला दिवसाआडच पाणी पुरवठा कायम ठेवण्याचा मानस पाणी पुरवठा विभागाचा आहे.
औद्योगिक, कामगार, स्मार्ट सिटीकडून मेट्रो सिटीकडे पिंपरी-चिंचवड शहराची मोठ्या झपाट्याने वाटचाल होत आहे. शहराची सध्या सुमारे 27 लाख लोकसंख्या असून शहर दिवसेंदिवस वाढत आहे. शहराच्या चारही बाजूला टोलेजंग बांधकाम प्रकल्प उभारले जात आहेत. एकीकडे महापालिका प्रशासनाकडून सातत्याने दररोज नव-नवीन बांधकाम प्रकल्पांना मंजुरी दिली जात आहे. तर दुसरीकडे पाण्यासह इतर मुलभूत सुविधा देताना ताण येत असल्याची प्रशासनातील अधिकारी कबुली देत आहेत. वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याची मागणीही वाढली आहे. त्यामुळे मोशी, डुडूळगाव, चिखली, चऱ्होली, बोऱ्हाडेवाडी, रावेत, पुनावळे यासह आदी भागात पाण्याची समस्या जाणवत आहे.
शहराला मावळातील पवना धरणातून पाणी पुरवठा केला जात आहे. सध्या शहराला 510 एमएलडी पाणी देण्यात येत आहे. रावेत येथील पवना नदीच्या बंधाऱ्यावरून महापालिका पाणी उचलते. ते पाणी निगडीतील जलशुध्दीकरण केंद्रात आणून शुध्द केले जाते. त्यानंतर शहरातील विविध भागात हे पाणी वितरित केले जाते.
आंद्रा धरणाच्या पाण्यासाठी “तारीख पे तारीख”
शहराची पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता महापालिकेने भामा-आसखेड धरणातून 167 एमएलडी तर आंद्रा धरणातून 100 एमएलडी पाणी आणण्याचे नियोजन केले. भामा-आसखेड धरणाचे पाणी शहराला मिळण्यासाठी चार ते पाच वर्ष लागण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात आंद्रा धरणातून 100 एमएलडी पाणी आणण्यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. याचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे सांगत आहे. मात्र, आंद्रा धरणातील पाण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून महापालिका आयुक्तांकडून आणि प्रशासनाकडून “तारीख पे तारीख” सुरू आहे. सोमवार (दि.28) रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आंद्रा धरणाच्या पाणी आणण्यासाठी चिखलीतील जलशुध्दीकरण केंद्राचे उद्घाटन करण्याचे पालिकेचे नियोजन होते. मात्र, फडणवीस यांची वेळ मिळत नसल्याने उद्घाटन रखडले की काय? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
कर न भरल्यास जप्ती करता तर मुबलक पाणी कधी देणार?
एकीकडे महापालिकेचा कर आकारणी व कर संकलन विभाग कर वसुलीसाठी जप्तीची मोहीम राबवत आहे. करदात्यांची थेट टीव्ही, फ्रीज आणि इतर वस्तू जप्त करण्याची पालिका तयारी करत आहेत. मात्र, कर वसूल करताना महापालिकेने आपण करदात्यांना मुलभूत सुविधा तरी पुरतो का? याचा विचार केला पाहिजे. शहरातील नागरिकांना गेल्या तीन वर्षांपासून एक दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. नागरिकांना हक्काचे पाणी मिळत नाही. याला जबाबदार कोण? त्यामुळे नागरिकांमधून पालिकेच्या कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे.
अधिकाऱ्यांचे तोंडावर बोट
शहराला गेल्या तीन वर्षांपासून एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरू आहे. त्यामुळे विविध भागातील नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. आंद्रा धरणाचे पाणी आल्याशिवाय शहरातील पाण्याचा प्रश्न मिटणार नाही, हे सत्य आहे. मात्र, तीन वर्षांपासून सुरू असलेल्या पाणी पुरवठ्याबाबत अतिरिक्त आयुक्त-1 प्रदीप जांभळे-पाटील आणि पाणी पुरवठा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा या विषयावर बोलण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पाण्यासारख्या महत्वाच्या प्रश्नाचे पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना किती गांभीर्य आहे, हे यावरून दिसून येते