आळंदी (ज्ञानेश्वर फड/ एम डी पाखरे) – कार्तिकी एकादशी आणि संत ज्ञानेश्वर महाराज 726वा संजीवन सोहळ्यासाठी 5 लाखावर भाविक अलंकापुरीत दाखल झाले असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गुरुवार दि. 17 पासून माऊलींच्या समाधी सोहळ्याला सुरुवात झाली होती. सोमवार दि. 20 कार्तिकी एकादशी आळंदीची मुख्य यात्रा होती. तर मंगळवारी दि. 22 माऊलींचा समाधी सोहळा आहे. 17 तारखेपासून भाविक आळंदीत येण्यास सुरुवात झाली होती. तेंव्हापासून भाविक विविध वस्तूंची खरेदी करत होते. करोनानंतर यावर्षी पहिल्यांदाच निर्बंधमुक्त कार्तिकी वारी झाल्याने यात्रेत अर्थव्यवस्थेला चालना मिळाली. यावर्षी कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली आहे. यात्रेला आलेले भाविक आज द्वादशीला सोमवार (दि. 21) दिवसभर भजनासाठी लागणारे साहित्य टाळ, पखवाज, विणा, विविध देवतांच्या मूर्ती, ज्ञानेश्वरी, अभंग गाथा आदी धार्मिक ग्रंथ, प्रसाद, तुळशीच्या माळा, स्वेटर, लहान मुलांसाठी खेळणी अश्या विविध वस्तूंची खरेदी करताना दिसून आले.
“दोन वर्षे कोरोनाचे निर्बंध असल्यामुळे यात्रेला येणाऱ्या भाविकांची संख्या कमी होती. यावर्षी मोठ्या संख्येने भाविक वारीला आले होते. माझे टाळ, पखवाज, विणा आदी भजन साहित्य विक्रीचे दुकान आहे. यावर्षी अपेक्षेप्रमाणे चांगला व्यवसाय झाला.” – बाळासाहेब गुरव (स्वरांजली हार्मोनियम)
“आमचे मूर्ती विक्रीचे दुकान आहे. यावर्षी मोठया प्रमाणात भाविक आले होते. भाविकांनी चांगल्या प्रकारे खरेदी केली. आमच्या अपेक्षेप्रमाणे विक्री झाली” – विकास सुभाष वाडेकर (बालाजी मूर्ती भांडार)
“आमचे स्वेटर विक्रीचे दुकान आहे. यावर्षी मोठी यात्रा भरली. यावर्षी ऐन यात्रेदरम्यान कडाक्याची थंडी जाणवत होती. त्यामुळे चांगली विक्री झाली. आम्ही भाड्याने घेतलेल्या गाळ्याला 40 हजार भाडे आहे. ते भाडे निघून वर चांगला नफा होण्याची शक्यता आहे. भाविकांची खरेदी सुरूच आहे. आणखी दोन दिवस भाविक खरेदी करतील.” – मोहम्मद गुफारण (स्वेटर दुकान विक्रेता)
“आमचे माऊली मंदिर परिसरात ग्रंथ विक्रीचे दुकान आहे. शेकडो भाविकांनी ज्ञानेश्वरी, तुकाराम महाराज अभंग गाथा, रोजनिशी, हरिपाठ, भगवद्गीता आदी ग्रंथांची खरेदी केली. अपेक्षेप्रमाणे विक्री झाली.” – मुकेश बाळकृष्ण गुजर (गुजर बंधू ग्रंथ भांडार)
खेळणी, प्रसादाला मागणी कमी –
लहान मुलांची खेळणी आणि प्रसाद विक्रेते सागर मेनकुदळे यांनी सांगितले की, यावर्षी मोठ्या संख्येने भाविक वारी सोहळ्यात सहभागी झाले मात्र लहान मुलांची खेळणी आणि प्रसाद विक्री अपेक्षेप्रमाणे झाली नाही. पन्नास टक्क्यांहून अधिक साहित्य तसेच शिल्लक आहे. यावर्षी खेळणी आणि प्रसाद खरेदीकडे भाविक, यात्रेकरूंनी पाठ फिरवली.
दरम्यान, सर्वसमावेशक उलाढाल पहिली तर यावर्षी रेकॉर्डब्रेक उलाढाल झाल्याची शक्यता काहींनी वर्तवली आहे. दोन वर्षानंतर वारी सोहळा निर्बंधमुक्त झाल्याने यावर्षी भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. सरासरी प्रत्येक भाविकाने एक हजार रुपये खर्च केले आहेत.