पावसाचा “रेग्युलेटर’ कधी कुणाच्या हातात असतो का? हवा तसा पाऊस कमी-जास्त करता येत नाही. अहो, त्रेतायुगातसुद्धा भगवान श्रीकृष्णांना गोवर्धन उचलून गोकुळवासीयांचा बचाव करावा लागला होताच ना? कलियुगात कुणाला कुणाचा तसा बचाव करता येणं शक्य नाही हे खरं; पण शहर पाण्याखाली कुणामुळे गेलं, या विषयावर चर्चा रंगवता येतात, त्यांचा व्हॉल्यूम वाढवता येतो आणि आर्थिक नुकसान झाल्यामुळे आरडाओरडा करणाऱ्या नागरिकांचा आवाज दडपून टाकता येतो.
नुकसान झालेले लोक “आपले’ असतील तर “ठेविले अनंते..’ म्हणून गप्प बसतात. विरोधकांच्या गोटातल्या कुणाचं नुकसान झालं तर त्याला सांगता येतं, “बाबा रे… इतकी वर्षे तू चूक करत राहिलास त्याचाच हा परिणाम आहे. भोग आता कर्माची फळं..!’ वस्तुतः शहर कोणतंही असो, पावसाचं पाणी आमच्यामुळे कधीच साचत नाही. ती विरोधकांची चूक असते. आम्ही सत्तेवर असलो तरी आधीचे सत्ताधारी या परिस्थितीला जबाबदार असतात.
आम्ही गेली किती वर्षे सत्तेवर आहोत आणि आम्ही स्वतः किती पावसाळे पाहिले, याला शून्य महत्त्व असतं. विरोधकांनी नेमलेले कंत्राटदार नालेसफाईच्या नावाखाली केवळ पैसे उकळण्याचं काम करतात. शिवाय, पावसाळ्यातले पावसाचे दिवस कमी होऊन एका दिवसात जास्त पाऊस पडण्याचं प्रमाण वाढणं किंवा वर्षभरात कधीही, कसाही, कितीही पाऊस पडणं हा आमच्या विरोधकांच्याच नियोजनातील त्रुटींचा परिणाम असतो.
एकंदरीत काय, तर शहरात पाणी साचणं आणि गाड्या वगैरे वाहून जाणं याला आम्ही अजिबात जबाबदार असत नाही. लोकांना परिस्थिती ठाऊक असूनसुद्धा ते जर असुरक्षित ठिकाणी गाड्या लावत असतील, तर त्याला आम्ही काय करणार? गाड्या उभ्या करण्यासाठी पुरेशी व्यवस्था पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी दिलेली नसते. शिवाय, फक्त पूर्वीचे सत्ताधारी किंवा सध्या सत्तेवर असलेले विरोधकच अनियंत्रित शहरविस्ताराला कारणीभूत असतात. शहरात रिकाम्या जागा सोडणं, पावसाच्या पाण्याचे लोंढे आल्यास त्याच्या वहनाची व्यवस्था करणं, ही विरोधकांचीच जबाबदारी असते.
ते आता सत्तेवर असतील तरी… नसतील तरी! आम्ही मात्र दिसेल तिथं कॉंक्रिट टाकणार; कारण कॉंक्रिटीकरण हीच विकासाची एकमेव दृश्य खूण आहे. शहरांची लोकसंख्या वाढतीये, त्यानुसार गरजा वाढतायत, त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीनं कॉंक्रिटीकरण अपरिहार्यच नाही का! ते आम्ही करणार… नव्हे “आम्हीच’ करणार आणि जंगी उद्घाटन समारंभ घडवून आणणार. हवामान बदल वगैरे गोष्टींशी आमचा काहीही संबंध नाही. का असावा? मुळात पर्यावरण हे एक शास्त्र आहे हेच आम्हाला मान्य नाही. विकास निसर्गाला पूरकच असला पाहिजे, वगैरे झूट आहे. विकासाचे शत्रू असणाऱ्या पर्यावरणवाद्यांचा हा कांगावा आम्हाला बिलकूल मान्य नाही.
विरोधकांना पर्यावरण वगैरे क्षुल्लक बाबी मान्य असतील तर त्यांनी करावा पर्यावरणाला अनुकूल विकास..! पण या बाबतीत ते आम्हाला विरोध करणार नाहीत, याची खात्री आहे. शहरं अनियंत्रित पद्धतीनंच वाढली पाहिजेत आणि तिथं भौतिक सुविधांची रेलचेल असली पाहिजे, यावर आम्हा उभयतांचं एकमत आहे. “विकास म्हणजे कॉंक्रिट’ हे दोघांनाही मान्य आहे. विरोधात असताना ज्या धोरणावर टीका केली, तीच सत्तेत आल्यावर राबवायची, यावरही आमचं एकमत आहेच!