नारायणडोहा – नगर तालुक्यातील देवगावच्या महिला सरपंचाच्या पतीला जीवे मारण्याची सुपारी देत त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्याची घटना दि.17 ऑगस्ट रोजी घडली. जखमी संभाजी वामन यांनी सांगितले की, गुंडांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या घटनेला एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला आहे.
परंतु, पोलिसांनी अनेक गोष्टींचा तपासच केलेला नाही. घटनेतील मुख्य आरोपी विठ्ठल तुकाराम वामन आणि नानाभाऊ वामन अजून फरार आहेत. त्यांच्याकडील घटनेतील रिव्हॉल्वर तसेच स्कॉर्पिओ ही गाडी पोलिसांनी जप्त केली नाही. तक्रारीत सांगून सुद्धा त्यांनी या गोष्टी नमूद न करता उलट मलाच अगोदर या घटनेचा साक्षीदार घेऊन या, मगच मान्य करू, अशी संशयास्पद भूमिका घेतली आहे. देवगावचे ग्रामसेवक अरविंद शेळके यांनीही सदर घटनेबाबत माहिती दिली. घटनेतील आरोपीने शेळके यांना फोन करून संभाजी वामन यांना जीवे मारणार असल्याची धमकीही दिली होती.