नगर – रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लोकांना रोजगार उपलब्ध होत आहे. पगार कमी मिळत असल्याने मजुरांची कमतरता जाणवत आहे. सध्या जिल्ह्यात रोजगार हमी योजनेत जिल्ह्यात फक्त दीड हजार कामे सुरू असून या कामांवर अवघे 6 हजार 680 मजूर काम करत आहेत. सध्या बेरोजगारीची समस्या वाढत असताना रोजगार हमीच्या माध्यमातून सरकार रोजगार उपलब्ध करून देत आहे.
जिल्ह्यात ठिकठिकाणी रोजगार हमी योजनेतील कामे सुरू आहेत. यामध्ये वृक्षारोपण, घरकुल बांधकाम, रस्त्यांचे बांधकाम अशी कामे सुरू आहेत. या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांना निश्चित रोजगार उपलब्ध होत आहे. असे असले तरी मजुरांची कमतरता जाणवत आहे. तसे पाहिले तर मजुरांची नेहमीच टंचाई असते. कमी पगार हे मजूर कमतरतेमागे एक महत्वाचे कारण आहे. सध्या जिल्ह्यातील ग्रामपंचायतीत 1194 तर अन्य सरकारी यंत्रणांमार्फत फक्त 382 कामे सुरू आहेत.
कामांची स्थिती (कंसात मजूर संख्या)
-अकोले 113 (377), जामखेड 224 (856), कर्जत 169 (745), कोपरगाव 85 (210), नगर 83 (465), नेवासा 115 (574), पारनेर 62 (298), पाथर्डी 127 (640), राहाता 41 (171), राहुरी 82 (229), संगमनेर 131 (614), शेवगाव 159 (613), श्रीगोंदा 142 (677), श्रीरामपूर 43 (211)
मिळतोय फक्त 256 रुपये रोज
-केंद्र सरकारने रोजगार हमी योजनेच्या मजुरीत वाढ केली आहे. ही पगारवाढ करताना सध्याच्या वाढलेल्या महागाईचा कोणताही विचार सरकारने केलेला नाही. मजुरीत फक्त 8 रुपये वाढ केली आहे. मजुरांना आता दर दिवशी 256 रुपये इतकी मजुरी मिळत आहे. याआधी 248 रुपये मिळत होते.