खरीप हंगाम वाया : तालुक्यात आतापर्यंत 330.8 मिमी पावसाची नोंद
काही ठिकाणी पंचनामे पूर्ण
रामदास सांगळे
बेल्हे – जुन्नर तालुक्यात सतत सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. जुन्नर तालुक्यातील सप्टेंबर महिन्यात 75.6 सरासरी पाऊस झाला आहे तर एकूण 330.8 मिमी पावसाची आतापर्यंत नोंद झाली आहे. या पावसामुळे तालुक्यातील 4 हजार 900 हेक्टर क्षेत्र नुकसानग्रस्त झाले आहे. त्यामुळे तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
तालुक्यात पिकांचे पंचनामे पूर्ण झालेले नाहीत. तालुक्यामध्ये सर्वाधिक फटका भाजीपाला, सोयाबीन पिकाला बसला आहे. अतिवृष्टीमुळे भाजीपाला पीक खराब झाल्याने भाज्यांचे दर कडाडले आहेत. यंदा खरीप हंगाम वाया गेला असून सोयाबीन, बाजरी, भुईमूग, फळबागा, कापूस पिकांचे नुकसान झाले आहे.
तसेच पालेभाज्या, फळभाज्या पूर्ण नुकसान झाले असून काही ठिकाणी पंचनामे पूर्ण झाले आहेत तरी अजून पंचनामे सुरू आहेत. राज्य सरकारने सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांकडून होत आहे.
जुन्नर तालुक्यात सतत पाऊस सुरू आहे. कृषी विभाग, तलाठी, ग्रामसेवक यांनी एकत्रित पंचनामे करणे अपेक्षित आहे; पण तसे केल्या सर्व पंचनामे होण्यास बराच कालावधी लागेल. त्यासाठी 30 कृषी सहाय्यक, पर्यवेक्षकांना गावे वाटून घेतली आहेत.तलाठी ग्रामसेवक वेगवेगळ्या गावात जाऊन पंचनामे करत आहेत. काहीसा वेळ लागेल पण नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे होतील.
सतीश शिरसाठ, तालुका कृषी अधिकारी, जुन्नर
यंदा वारंवार झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे शेतकऱ्यांची पिके उध्वस्त झाली आहेत. हंगाम उलटल्याने दुसरे पीकही शेतामध्ये घेता येत नाही. त्यामुळे सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी आम्हा शेतकऱ्यांची मागणी आहे.
– जालिंदर बांगर, सरपंच,बांगरवाडी
ओला दुष्काळ जाहीर कराय शिवसेना आक्रमक
तहसील कार्यालयावर काढला मोर्चा
सरसकट नुकसान भरपाईसह वीजबिल माफीची मागणी
पुणे – जुन्नर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या प्रमुख मागणीसह वीजबिल माफी, नुकसान भरपाई द्या आदीं मागणीसह शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरत जुन्नर तालुका शिवसेनेच्या वतीने जाहीर मोर्चा काढण्यात आला.
मागील अनेक दिवसांपासून जुन्नर तालुक्यात अतिवृष्टीने शेतमालाचे, फळबागांचे, नगदी पिकांचे तसेच रस्ते, इमारती व शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जुन्नर तालुका 100 टक्के शेतीवर अवलंबून असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे.
सरकारणे संपूर्ण जुन्नर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, तसेच शेतकऱ्यांना तातडीने सरसकट नुकसानभरपाई द्यावी या व अन्य मागण्यासाठी शिवसेना, मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड आणि शेतकऱ्यांच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
मोर्चाची सुरवात छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ स्मारकापासून झाली व निवासी नायब तहसीलदार यांना निवेदन देऊन सांगता झाली. शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेने कडून तालुक्यात प्रथमच झालेल्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला.
सध्याचे राज्यसरकार हे सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेऊ शकत नसून ते मिंधे सरकार असल्याची टीका शिवसेना जिल्हा समन्वयक अविनाश रहाणे यांनी केली. याप्रसंगी धुळे-नंदुरबारचे संपर्क प्रमुख बबन थोरात, संभाजी ब्रिगेडचे रमेश हांडे, शिवसेना महिला आघाडी माजी जिल्हा प्रमुख विजया शिंदे, माजी आमदार बाळासाहेब दांगट, सरपंच बाबू पाट आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बन्सी चतुर यांनी, सूत्रसंचालन तालुका प्रमुख माऊली खंडागळे यांनी तर तालुका संपर्क प्रमुख दिलीप बामणे यांनी आभार मानले.
समृद्ध अशा जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्याला पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन आत्महत्या करावी लागते हे शासनाच्या चुकीच्या धोरणाचा परिणाम आहे, असे शेतकरी विरोधी केंद्र सरकार बदलणे गरजेचे आहे.
– बाळासाहेब दांगट, माजी आमदार