केंद्रीय आदिवासी राज्यमंत्री रेणुका सिंह यांचा दावा
मंचर – शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये 2024 ला भाजपकडून उमेदवार उभा केला जाणार असून तो निवडून येईल, असा दावा केंद्रीय आदिवासी राज्यमंत्री रेणुका सिंह यांनी केला आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघात भाजप आपली ताकद आजमावणार आहेत. या मतदारसंघाची जबाबदारी त्यांच्याकडे दिली असून, या मतदारसंघाचा तीन दिवसीय दौरा त्या करीत आहेत. या मतदारसंघातील अडीअडचणी त्या समजून घेत आहेत. दौऱ्यादरम्यान मंचर (ता. आंबेगाव) येथे पत्रकार संवाद मेळावा कार्यक्रमावेळी रेणुका सिंह यांनी अनेक विषयांवर चर्चा केली. यावेळी आमदार महेश लांडगे, भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संजय थोरात, भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, धर्मेंद्र खांडरे, संजय घुडरे, आशा बुचके, अतुल देशमुख, जयसिंगराव एरंडे, ताराचंद कराळे, रवींद्र त्रिवेदी, गणेश थोरात यांसह भाजपचे आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.
रेणुका सिंह म्हणाल्या, गेल्या आठ वर्षांपासून मोदी सरकारने जनसामान्यांसाठी काम करताना चांगले निर्णय घेतले आहेत. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाबाबत त्यांनी सांगितले की, बाल लैंगिक अत्याचार, आदिवासी रोजगार निर्मिती, हिरडा खरेदी, कांदा निर्यात बंदी, बटाटा खरेदी, लम्पी आजारामुळे बैलगाडा शर्यतीची सध्याची बंदी, रेल्वे महामार्ग, विमानतळ, मोबाइल टॉवर संदर्भात, तसेच आदिवासी जमिनींबाबत लवकरच मंत्रालय स्तरावर बैठक आयोजित करून विविध प्रश्नांसंदर्भात कार्यवाही केली जाणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय थोरात यांनी केले. सूत्रसंचालन आणि आभार पूजा थिगळे यांनी केले.
कॉंग्रेस “गुगल’वर शोधावी लागेल
कॉंग्रेसचे राहुल गांधी यांनी “भारत जोडो यात्रा’ करण्यापेक्षा कॉंग्रेसमध्ये माणसं जोडण्याचे काम केली पाहिजे. कितीतरी नेते कॉंग्रेस सोडून चालले आहेत. येथून पुढील काळात कॉंग्रेसला गुगलवर शोधण्याची वेळ येऊ शकते. कॉंग्रेस नेतृत्वहीन झाली आहे, असा घणाघात रेणुकासिंह यांनी केला.