येरवडा, दि. 15 (प्रतिनिधी) -जय जवान नगर परिसरात 10 ते 12 वर्षांपूर्वी टाकण्यात आलेल्या ड्रेनेजच्या पाइपलाइन जुन्या झाल्याने त्या अंतर्गत ठिकाणी फुटल्या आहेत अनेक ठिकाणी त्या तुंबल्याने ड्रेनेजचे पाणी घरात परत फिरत आहे. तसेच, परिसरातही हे पाणी साचत असल्याने मोठी दुर्गंधी सुटत आहे. जुन्या पाइपलाइन बदलून त्या नव्या टाकव्यात, या समस्येतून सुटका करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली असून क्षेत्रीय कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे.
जय जवान नगर अमृतेश्वर गणेश मंदिरामागे 80 ते 90 घरे आहेत. मागील अनेक वर्षांपासून त्यांच्या घरासमोर ड्रेनेजचे पाणी साचत आहे. मोठा पाऊस झाला तर हे पाणी बाथरुममधून घरात जाते. याच घाण पाण्यात थांबून महिलांना स्वयंपाक करावा लागतो, लहान मुलांना अभ्यास करावा लागतो, या समस्येबाबत अनेकवेळा स्थानिक लोकप्रतिनिधींना आणि आरोग्य कर्मचारी, अधिकाऱ्यांकडे तक्रारी, निवेदने दिली आहेत. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. याबाबत पालिकेकडे ऑनलाइन तक्रारही करण्यात आली. त्यानंतर केवळ जेटिंग मशीन आणि कर्मचारी पाठवून तात्पुरते काम करण्यात आले. मात्र, पुनःपुन्हा हीच समस्या येथे निर्माण होत आहे.
ड्रेनेजलाइनचे पाइप कमी व्यासाचे आणि जुने झाल्याने तसेच पावसाळ्यापूर्वी लाइनची साफसफाई झाली नसल्याने ही समस्या कायम आहे. त्यामुळे मोठ्या व्यासाची लाइन टाकण्यात यावी, यासाठी येथील स्थानिक नागरिक गणेश टेकवडे व 20 ते 25 नागरिकांनी येरवडा क्षेत्रीय कार्यालयाला निवेदन दिले आहे. समस्या सुटली नाही तर मोर्चा आणू, असा इशारा दिला आहे.
येरवडा प्रभाग क्र. 6 येथे करोडो रुपयांचा निधी ड्रेनेजलाइन टाकण्यासाठी आणि स्वच्छतेसाठी खर्च केला असूनही संपूर्ण प्रभागात ड्रेनेज
तुंबणे, स्वच्छतागृह स्वच्छ नसणे या समस्या जशाच्या तशाच आहेत. त्यामुळे हा निधी कुठे खर्च केला गेला, याची चौकशी आयुक्तांनी करावी, अशी मागणी भाजपचे अल्पसंख्याक मोर्चाचे अन्वर पठाण, रमेश गव्हाणे, विकास सोनवणे, सागर बारी, प्रताप मोहिते, गणेश देवकर यांनी केली आहे.