दिवे – पुरंदर तालुक्याच्या पश्चिम भागात रविवारी (दि. 11) सायंकाळी ढगफुटीसदृश पावसाने झोडून काढल्याने अनेक घरांच्या भिंती ढासळल्या असून शेतीसह इतरही मोठे नुकसान झाले आहे. नदी-नाले, ओढे यांना पूर येवून दुथडी पार करून पाणी तुडुंबपणे वाहत होती तर रस्त्यावर वाहन चालवणे अवघड झाले होते.
पुरंदरमधील पावसाच्या तडाख्यात सासवड-कात्रज रस्त्यावर असलेला हीवरे गावाजवळील पुलावरून पाणी वाहिल्याने बऱ्याचवेळ वाहनांना पाणी कमी होईपर्यंत थांबावे लागले. पावसाचा जोर दिवे परिसरासह पश्चिम भागातील चांबळी गावापासून बोरगाव, भिवरी, आस्करवाडी, पठारवाडी, नाटकरवाडी, गराडे, सोमुर्डी, वारवडी, दरेवाडी, दुरकरवाडी, कोडीत, पुरंदर किल्ले भागातील नारायणपूर, चिव्हेवाडी, देवडी, केतकावळे, पुर-पोखर, कुंभोसी, भिवडी, सुपे आदी भागात अधिक होता, त्यामुळे शेतातील पिकेही वाहून गेली असून शेतात पाणी साचले आहे.
तर दुसऱ्या दिवशी देखील शेतात पाणी होते तर रस्त्यावर खड्डे व पाणी साचलेले होते. या पावसामुळे शेतीच्या ताली फुटल्याने पिके वाहून गेलीच; परंतु पावसाने शेतकरी, परिसरातील नागरिक यांची दाणादाण उडाली होती. तर जनजीवन विस्कळीत झाले होते. यावर्षी अतिवृष्टीचा शेतीला चांगलाच जोरदार फटका बसला आसून फळपिकांना व भाजीपाला, आणि इतर पिके खराब झाल्याने शेतातील उभी पिके जमीनदोस्त झाली आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गात चांगलीच चिंता सतावताना दिसत आहे.