मुंढवा, दि. 27 -मुंढवा-केशवनगर परिसरात मुख्यरस्त्याच्या पदपथांवरच कचरा साचल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. पदपथांवरून चालणेही पादचाऱ्यांना नकोसे झाले आहे. काही नागरिकांकडून मोकळ्या जागंवर कचरा टाकला जात असून अशांवर पालिकेकडून दंडात्मक करवाई करणे गरजेची असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.
मुंढवा-केशवनगर परिसरासह हडपसर रेल्वे स्टेशन, नदीपात्र, वाडेकर आळी, भैरवनाथ मंदिराशेजारी व उड्डाणपूलाखालील परिसरात अनेक ठिकाणी मोकळी जागा, पटांगणे परिसरात, पदपथांवर कचरा टाकला जातो. यामुळे येथील परिसरात दुर्गंधी पसरली आहे. मुंढवा-केशवनगर परिसर कंटेनर मुक्त केल्याने “स्वच्छ संस्थे’तर्फे घरोघरी कचरा गोळा करणारे कर्मचारी नेमण्यात आले. परंतु, येथे कचरा टाकण्याच्या सवयीमुळे अनेक ठिकाणी कायमच कचऱ्याचे ढीग पहायला मिळत आहेत. त्यामुळे मोकाट जनावरेही येथे गर्दी करतात. हा कचरा संबंध पदपथांवरही अस्ताव्यस्त पडलेला असतो, त्यामुळे नागरिकांना येथील पदपथांवर चालणेही अवघड झाले आहे. स्वच्छतेच्या कामाकडे क्षेत्रीय कार्यालय प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष आहे.