प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 7 – राष्ट्रपुरुषांची स्मारके तसेच गडकोटांची देखभाल व संवर्धन अधिक चांगल्या पद्धतीने व्हावे, या उद्देशाने पुरातत्त्व खात्याने पालकत्व योजना आणली आहे. त्यानुसार, यासाठी इच्छुक असलेली कोणतीही व्यक्ती अथवा संस्था याचे पालकत्व स्वीकारु शकतील. हे पालकत्व पाच वर्षांसाठी असेल.
या योजनेनुसार आतापर्यंत पाच स्मारके व किल्ल्यांचे पालकत्त्व स्वीकारण्यात आले आहे. त्यामध्ये उस्मानाबादमधील नळदुर्ग किल्ल्याचे सोलापुरातील युनिटी मल्टीकॉनने पालकत्त्व स्वीकारले आहे. याशिवाय घोडबंदर किल्ल्याचे मीरा-भाईंदर महापालिकेने, सांगलीतील यशवंतराव चव्हाण जन्म ठिकाणाचे मुंबईतील यशंवतराव चव्हाण प्रतिष्ठानने, मुंबईतील डीन बंगल्याचे जे. जे. शाळेने, तर नाशिकमधील सावरकरांच्या जन्म ठिकाणाचे सावरकर प्रतिष्ठानने पालकत्त्व स्वीकारले आहे.
स्मारकांचे जतन व पुनरुज्जीवन करुन पुढच्या पिढीला संस्कृतीची आणि परंपरेची ओळख व्हावी, या उद्देशाने “महाराष्ट्र वैभव- राज्य संरक्षित स्मारक संगोपन योजना’ सरकारने सुरू केली आहे. स्मारकांचे जतन, दुरुस्ती-
देखभाल, सुशोभीकरण व विकास कामांसाठी सार्वजनिक सहभाग मिळविणे, समाजात वारसा जतनाची जाणीव रुजावी हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. राज्य संरक्षित स्मारकांचे जतन आणि संवर्धन करु इच्छिणाऱ्या संस्थांना, व्यक्तींना, कॉर्पोरेट क्षेत्रांना, विश्वस्त मंडळांना आणि याविषयी अभ्यास असणाऱ्या व्यक्तींना या योजनेत सहभाग घेता येणार आहे.
राज्यात स्मारकांच्या संवर्धनासाठी पालकत्व योजना राबवली जात आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाशी संपर्क साधावा.
– डॉ. विलास वाहणे, सहायक संचालक, पुरातत्त्व विभाग
पुरातत्व खात्याकडून यादी प्रसिद्ध
सांस्कृतिक वारशाचे जतन करण्याची संधी सर्वसामान्य नागरिक, संस्था, मंडळांना मिळणार आहे. या योजनेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांसाठी स्मारकांची यादी पुरातत्व खात्याने प्रसिद्ध केली आहे. त्यातून आपल्याला हव्या असलेल्या स्मारक किंवा किल्ल्याची निवड करता येणार आहे. संबंधिताला या स्मारकाचे पाच वर्षांसाठी पालकत्व घेता येणार आहे.