धनकवडी, दि. 4 (प्रतिनिधी) –ऊन आणि पावसाच्या खेळात वातावरण सतत बदलत आहे. धूळ तसेच धूर यातून प्रदूषण तसेच विषाणूजन्य आजारांचे प्रसार यामुळे सर्दी, खोकला, ताप यासह डोळ्यांच्या आजारांचे धनकवडी परिसरात वाढले आहे. येथील महापालिकेच्या स्वर्गीय विलासराव तांबे आरोग्य दवाखान्यात दररोज सुमारे 300 ते 350 रुग्ण विविध विषाणूजन्य आजारांची तपासणी तसेच उपचारासाठी येत आहेत.
धनकवडी, आंबेगाव पठार, तळजाई पठार, चैतन्य नगर यासह परिसरात विषाणूजन्य आजारांचे रुग्ण वाढले आहेत. साथीचे व विषाणूजन्य आजारांपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, यासाठी मास्कचा वापर सतत करावा, लक्षणे आढळल्यास तत्काळ उपचार घ्यावेत, असे तांबे दवाखान्यातील वैद्यकीय अधिकारी डॉ. परिमल भोसले यांनी सांगितले. ताप, सर्दी, खोकला असेल तर त्वरित वैद्यकीय सल्ला घेऊन उपचार घ्यावेत. ताप असेल तर मुलांना शाळेत पाठवू नये. पूर्ण विश्रांती व पाणी भरपूर प्यावे, असे डॉ. अमोल खडके यांनी सांगितले.