नवी दिल्ली – सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि इतर केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप करत विरोधकांनी गुरूवारी संसदेत आक्रमक पवित्रा स्वीकारला. त्यामुळे लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांचे कामकाज विस्कळीत झाले. त्यातून ईडीवरून संसदेच्या कामकाजाची बिघाडी झाल्याचे चित्र समोर आले.
लोकसभेत विरोधकांनी आणि विशेषत: कॉंग्रेस सदस्यांनी केंद्रीय यंत्रणांच्या गैरवापराचा आरोप करत जोरदार घोषणाबाजी केली. त्या आरोपाशी संबंधित आणि महागाईचा निषेध करणारे फलकही विरोधकांनी झळकावले. गदारोळ कायम राहिल्याने लोकसभेचे कामकाज दुपारच्या सुमारास दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
लोकसभेसारखाच गदारोळ राज्यसभेतही झाला. विरोधकांनी केंद्रीय यंत्रणांच्या गैरवापराचा आरोप लावून धरला. त्यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमकी झडल्या. त्यामुळे राज्यसभेचे कामकाजही विस्कळीत झाले.