कोलकाता- प. बंगालमधील शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात अटकेत असलेले पार्थ चॅटर्जी यांची सहकारी अर्पिता मुखर्जीच्या घरातून 50 कोटी रूपये रोकड आणि सोने जप्त करण्यात आले आहे. मात्र हे पैसे आपले नसल्याचा दावा चॅटर्जी यांनी केला आहे. चॅटर्जी आणि मुखर्जी यांना अमलबजावणी संचालनालयाने अटक केली आहे.
चॅटर्जी यांना आरोग्य तपासणीसाठी कोलकाता येथील इस्पितळात आणण्यात आले आहे. यावेळी ते जेव्हा वाहनातून उतरले तेव्हा त्यांना पैशाबाबत विचारणा करण्यात आल्यावर ते पैसे आपले नसल्याचे उत्तर त्यांनी दिले. तुमच्या विरोधात कोणी कट रचला आहे का, विचारल्यावर वेळ आल्यावर सर्व गोष्टी स्पष्ट होतील असे उत्तर त्यांनी दिले. दरम्यान, तृणमूल कॉंग्रेस पक्षाने त्यांना निलंबित केल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. या निर्णयामुळे माझ्या निष्पक्ष चौकशी केली जाण्यावर प्रभाव पडू शकतो. मात्र ममता बॅनर्जी यांनी त्यांची मंत्रिपदावरून केलेली हकालपट्टी योग्य असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, तृणमूल कॉंग्रेसचे महासचिव कुणाल घोष म्हणाले की, चॅटर्जी यांना अटक केल्यावर ते इतके दिवस गप्प का होते? त्यांना न्यायायालयाचे दार ठोठावण्याचा आणि आपले निरपराधित्व सिध्द करण्याचा पूर्ण अधिकार आहे.