नवी दिल्ली – राजधानीतील सेंट्रल व्हिस्टामध्ये निर्माण केल्या जात असलेल्या नव्या संसद भवनातील राष्ट्रीय बोधचिन्हावरून चांगलेच वादंग निर्माण झाले असून आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. नव्या बोधचिन्हात सिंहाचा जबडा उघडा दाखवण्यात आला असून तो व्यवस्थित केला जावा अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
तसेच या बोधचिन्हात 2005 च्या अधिनियमाचे उल्लंघन करण्यात आले असून ते राष्ट्रभावनेला हानी पोहोचवणारे असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
अलदानिश रेन आणि रमेशकुमार मिश्रा या दोन वकिलांनी याचिका दाखल केली आहे. पंतप्रधानांनी काही दिवसांपूर्वीच या बोधचिन्हाचे अनावरण केले. मात्र त्यातले सिंह हे त्यांच्या उघड्या जबड्यामुळे क्रूर आणि आक्रमक असल्याचे प्रतित होते. ही बाब आपल्या संरक्षित राज्य प्रतिकाच्या विपरीत आहे.
सारनाथ संग्रहलायातील सिंह शांत आणि शांतच दिसून येतात असे त्यांचे म्हणणे आहे. सरकारने या रचनेत बदल करून राष्ट्रीय प्रतिकाच्या पवित्रतेचे उल्लंघन करत मनमानी केली आहे. भारताचे राजचिन्ह हे भारतीय प्रजासत्ताकाचे प्रतिक आहे. ती भारताची ओळख आहे. हा देश आमचा आहे. जर त्याच्या ओळखीतच हस्तक्षेप केला गेला तर तो राष्ट्रीय भावनेला धक्का पोहोचवणारा ठरतो असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.