नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांची दिल्लीमध्ये बैठक पार पडली. शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाच्या दृष्टीने ही बैठक अत्यंत महत्वाची समजली जाते. मात्र कोणाला कोणते मंत्रिपद मिळणार याचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. अशात आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले यांनी मनसेला मंत्रिपद देण्याबाबत विरोध दर्शवला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले होते. अशात एक आमदार निवडून आलेला असताना देखील मनसेची राज्यभर चर्चा होती. विधिमंडळात देखील बहुमत सिद्ध करताना शिंदे फडणवीस सरकारच्या बाजूने मनसे आमदार राजू पाटील यांनी मतदान केल्याचे पाहायला मिळाले.
अशात मनसेला देखील मंत्रिपद मिळणार ? अशी चर्चा सुरु असताना आठवलेंनी मात्र याला विरोध दर्शवलाय. मनसे निवडणुकीत आमच्या सोबत नव्हती त्यामुळे त्यांना मंत्रिपद देण्याचा संबंधच येत नाही. जर तस होत असेल तर आमचा त्याला विरोध असेल अशी भूमिका आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले यांनी घेतली आहे. कल्याणमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना आठवलेंनी आपले हे मत व्यक्त केले.
उद्धव ठाकरेंना आमदार सांभाळता आले नाहीत. शिंदेनी केलेलं बंड हे महाबंड आहे असे रोखठोख मत यावेळी रामदास आठवले यांनी व्यक्त केले. आठवलेंनी मनसेच्या मंत्रीपदाला विरोध दर्शवल्याने राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. मात्र भाजप यावर काय प्रतिक्रिया देत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.