लोणावळा – जग आधुनिकतेकडे वाटचाल करत असले तरी ग्रामीण भागातील अंधश्रद्धा अद्याप देखील कमी होताना दिसत नाही. असाच अंधश्रद्रचा एक प्रकार समोर आला आहे. अज्ञात व्यक्तीने मावळ तालुक्यातील वाकसई स्मशानभूमीत पाटीभर लिंबांचा उतारा टाकल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातारवण निर्माण झाले आहे. अशा व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
लोणावळा शहरापासून अवघ्या चार किमी अंतरावर असलेल्या व संत तुकाराम महाराज यांचे पादुकास्थान असलेल्या मंदिरासमोरील वाकसई गावाच्या वैकुंठ स्मशानभूमीत असाच एक प्रकार ग्रामस्थांना बुधवारी (दि.22) पहायला मिळाला. काही ग्रामस्थ एका सहामासी कार्यक्रमासाठी स्मशानभूमीत गेलेले असताना, त्याठिकाणी पाटीभरून लिंबे पहायला मिळाली.
काही लिंब कापलेली होती, त्यामध्ये गुलाल, अबिर भरलेला होता, काही पिना, टाचण्या, नारळ, अन्य काही फळे ठेवण्यात आलेली होती. हा सर्व प्रकार पाहून ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. मागील काळात देखील या स्मशानभूमीत असे प्रकार घडले होते. आजचा प्रकार मात्र भयंकर असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. पोलीस प्रशासनाने तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीने याबाबतची चौकशी करून असे प्रकार करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी वाकसई ग्रामस्थांनी केली आहे.