मुंबई – महाराष्ट्रातील आगामी निवडणुकांत समविचारी पक्षांशी आघाड्या स्थापण्याची चाचपणी करण्यासाठी प्रदेश कॉंग्रेस समित्या नेमणार आहे. त्यामुळे स्वबळावर लढण्याच्या भूमिकेपासून कॉंग्रेसने घूमजाव केल्याचे मानले जात आहे.
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सातत्याने स्वबळाचा नारा दिला. त्यामुळे आगामी निवडणुकांत एकला चलो रे असे धोरण कॉंग्रेस अवलंबणार असल्याची चर्चा सुरू झाली. मात्र, त्या चर्चेला छेद देणारा एक ठराव प्रदेश कॉंग्रेसच्या शिर्डीतील नवसंकल्प शिबिरात मंजूर करण्यात आला.
त्यानुसार, प्रदेश कॉंग्रेस राज्य आणि जिल्हास्तरीय समित्या स्थापन करेल. त्या समित्या निवडणुकांआधी आघाड्या स्थापण्याविषयी राजकीय स्थितीचा आढावा घेतील. निवडणुकांची वेळीच तयारी करण्याच्या उद्देशातून प्रदेश कॉंग्रेस विविध पाऊले उचलणार आहे. त्याचाच भाग म्हणून निवडणूक व्यवस्थापनासाठी राज्यस्तरावर वेगळी यंत्रणा उभारली जाणार आहे.
देशाचा स्वातंत्र्यलढा आणि राष्ट्र उभारणीतील कॉंग्रेसचे योगदान तरूण पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी राज्यभरात विशेष कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. महागाई, बेरोजगारी, आरोग्य, शिक्षण, अन्नसुरक्षा, सामाजिक सुरक्षा आदी मुद्द्यांवरून केंद्र सरकारचे नेतृत्व करणाऱ्या भाजपला घेरण्याचा निर्धारही प्रदेश कॉंग्रेसने केला आहे.