पुणे – समाविष्ट गावांमध्ये महापालिकेची आरोग्यसेवा अद्याप पोहचू शकली नाही. मात्र, या भागातील नागरिकांना शहरी गरीब योजनेचा लाभ देण्याला महापालिकेने सुरूवात केली आहे. जिल्हापरिषदेच्या मालकीच्या आरोग्य केंद्राच्या इमारतींचे अद्याप हस्तांतरण झालेले नाही. यासाठी जिल्हा परिषदेने मोबदला मागितला आहे, त्यामुळे हे हस्तांतरण प्रलंबित राहिले आहे.
चार वर्षांपूर्वी महापालिकेच्या हद्दीत 11 गावांचा समाविष्ट केला गेला. त्यानंतर गेल्यावर्षी उर्वरित 23 गावांचा महापालिकेच्या हद्दीत समावेश केला गेला. या गावात महापालिकेकडून नागरी सुविधा पुरवण्यात येत नसल्याचा आरोप स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडून केला जात आहे. महापालिकेने या गावांतील पाणी पुरवठा आणि मैला-सांडपाणी वाहिन्या टाकण्याच्या कामाच्या कामाला मंजुरी दिली आहे.
या गावांमध्ये सुमारे आठ आरोग्य केंद्रे असून, त्याचा ताबा अद्याप मिळालेला नाही. महापालिकेला या गावात आरोग्य सुविधा देण्यासाठी जागांची आवश्यकता आहे. परंतु जागा उपलब्ध न झाल्याने तेथे महापालिकेची आरोग्य सुविधा मिळत नाही. सध्या या गावात जिल्हा परिषदेमार्फतच आरोग्य सेवा दिली जात आहे.
महापालिकेची आरोग्य सुविधा समाविष्ट गावांत मिळत नसली, तरी या भागातील नागरिकांसाठी शहरी गरीब योजना राबवण्यास सुरूवात केली आहे. याचप्रमाणे या गावांत “हेल्थ वेलनेस सेंटर’ सुरू करण्याची योजना आहे.
– डॉ. आशिष भारती, आरोग्य प्रमुख, मनपा