रशिया-युक्रेन युद्धामुळे पुढील काळात जागतिक राजकारण कसे असेल हे या क्षणाला खात्रीपूर्वक सांगणे जरी कठीण असले, तरी सध्या सुरू असलेल्या घडामोडींमुळे येणाऱ्या काळात निश्चितपणे जागतिक राजकारणात आमूलाग्र बदल घडून येतील.
जगाच्या इतिहासात अशा काही घटना घडतात ज्यामुळे संपूर्ण जगाचे भवितव्य बदलून जाते. उदाहरणार्थ, ब्रिटनमध्ये झालेली औद्योगिक क्रांती आणि त्यामुळे युरोपात सुरू झालेली वसाहतवादाची स्पर्धा, प्रथम व द्वितीय महायुद्ध, अमेरिका आणि रशिया यांच्यातील शीतयुद्धाचा काळ, सोव्हिएत संघाचे विभाजन अशी अनेक उदाहरणे आहेत.
सदर घटनांपैकी काही घटना या मानव जातीच्या कल्याणासाठी आवश्यक होत्या, तर काही विनाशास जबाबदार आहेत. सध्या सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धाचीसुद्धा येणाऱ्या काळात जगातील महत्त्वपूर्ण घटना म्हणून नोंद घ्यावी लागेल. सदर युद्धामुळे जागतिक राजकारणात अनेक आमूलाग्र बदल होणार असून त्याचे काही सकारात्मक, तर काही नकारात्मक परिणाम पुढील काळात पाहावयास मिळतील.
पाश्चिमात्य राष्ट्रांची एकजूट
पाशिमात्य किंवा ज्यांना युरोपियन राष्ट्रे म्हटले जाते अशी सर्व राष्ट्रे रशिया-युक्रेन युद्धामुळे एकत्र आल्याचे पाहावयास मिळाले. इतिहासात डोकावले तर अगदी आधुनिक जगाची सुरुवात झाल्यापासून पाश्चिमात्य राष्ट्रात कधीही एकजूट झाल्याचे दिसले नाही. किंबहुना जागतिक राजकारणात एकमेकांची स्पर्धक म्हणूनच ती पुढे आली आहेत. ब्रिटन आणि फ्रान्स यांच्यातील वितुष्ट, नेपोलियनने पादक्रांत केलेला युरोप, बिस्मार्कचे परराष्ट्र धोरण आणि पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये असलेली सत्तास्पर्धा जागतिक इतिहासाच्या अभ्यासाचे महत्त्वपूर्ण विषय आहेत.
अगदी भारतावर कोण राज्य करणार या स्पर्धेतून ब्रिटन आणि फ्रान्स यांच्यात झालेली “कर्नाटक युद्धे’ पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये असलेल्या बेबनावाची साक्ष देतात. प्रथम आणि द्वितीय महायुद्धात ही राष्ट्रे एकमेकांच्या विरोधात लढली. द्वितीय महायुद्धाच्या समाप्तीनंतर अमेरिका आणि सोव्हिएत संघ (रशिया) यांच्यातील स्पर्धेत पाश्चिमात्य राष्ट्रे एकमेकांवर कुरघोडी करीत होती. यूके, डेन्मार्क, नॉर्वे, पोर्तुगाल, फ्रान्स, इटली अशी युरोपातील पश्चिमेकडील राष्ट्रे अमेरिकेच्या गोटात होती, तर बल्गेरिया, रोमानिया, पोलंड, झेकोस्लोव्हाकीया, पूर्व जर्मनी ही पूर्व युरोपातील राष्ट्रे सोव्हिएत संघाच्या बाजूने होती.
थोडक्यात, पाश्चिमात्य राष्ट्रे ही कोणत्या ना कोणत्या कारणाने कायमच एकमेकांच्या विरोधात उभे राहिल्याचे दिसून येते. अगदी रशियाने युक्रेनवर हल्ला करण्यापर्यंत जर्मनी व फ्रान्स अमेरिकेच्या गोटातील समजली जात असूनही रशियाबरोबर मैत्री ठेवून होते. डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळात अमेरिकेने इराणवर आर्थिक निर्बंध लावल्यावर यूके, जर्मनी, फ्रान्स यांनी इराणबरोबर आपला व्यापार चालू ठेवला. इन्स्टेक्स नावाचे नवीन पेमेंट सिस्टम चालू करून इराणला व्यापार करताना कोणतीही अडचण येणार नाही याची पूर्ण काळजी वरील राष्ट्रांनी घेतली. अर्थात, अमेरिकेच्या छत्रछायेखालून ही राष्ट्रे हळूहळू बाहेर पडत असतानाच रशियाने युक्रेनवर हल्ला करून संपूर्ण जगाचा रोष आपल्याकडे ओढवून घेतला.
जागतिक राजकारणाचे समीकरण बदलण्याची शक्यता
रशिया-युक्रेन यांच्यातील सध्याच्या युद्धामुळे भविष्यात जागतिक राजकारणात कोणते बदल घडतील हे सध्या निश्चितपणे सांगता येत नसले, तरी सध्याच्या जगभरातील घडामोडींचा बरावाईट परिणाम भविष्यात होऊन जागतिक राजकारणात बरीच उलथापालथ घडून येईल.
1) पाश्चिमात्य राष्ट्रांची एकजूट भविष्यात जर अशीच कायम राहिली तर त्याचा थेट नकारात्मक परिणाम रशियाच्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो.
2) सोव्हिएत संघाच्या विघटनास जी प्रमुख कारणे जबाबदार आहेत त्यांपैकी वाढती बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि बेकारी ही प्रमुख कारणे आहेत. रशिया क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा देश असला तरी रशियाची अर्थव्यवस्था ही मर्यादित स्वरूपाची आहे. देशातील अनेक बंदरे ही आठ ते बारा महिने बर्फाच्छादित असल्यामुळे रशियाला इतर देशांशी व्यापार करताना अडचणींचा सामना करावा लागतो. रशियातील काही महत्त्वाची शहरे सोडली तर इतर ठिकाणी उद्योगधंद्यांचा अभाव आहे. पुढील काळात अमेरिकेचे रशियावरील आर्थिक निर्बंध जर असेच चालू राहिले तर आज जी परिस्थिती श्रीलंकेत आहे तीच परिस्थिती रशियात पाहावयास मिळाली तर आश्चर्य वाटणार नाही.
3) जगाला रशियाची (काल्पनिक) भीती घालून नाटोचा विस्तार करण्याबरोबरच संपूर्ण युरोप आपल्या कवेत घेण्याची आयती संधी अमेरिकेला चालून आली असून त्याचा पुरेपूर फायदा अमेरिका भविष्यात घेताना दिसेल.
4) रशियाला युद्धात साथ देणारे चीन, पाकिस्तान, इराण, तुर्की (काही अंशी भारत) ही राष्ट्रे अधिक एकजुटीने एकत्र आल्याचे पाहावयास मिळेल. परंतु, भविष्यात या गटाचे नेतृत्व रशियाकडे न येता चीनकडे येऊन चीनच्या रूपाने अमेरिकेसमोर एक नवीन आव्हान उभे राहिलेले असेल.
भारतासाठी इकडे आड-तिकडे विहीर
जागतिक राजकारणात कोणतीही ठोस भूमिका न घेण्याबद्दल भारत प्रसिद्ध आहे. परंतु, जागतिक राजकारणात भारताचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. यापुढील काळात एकाचवेळी परस्परविरोधी गटांतील सर्व घटकांना एकाच वेळी खूश ठेवण्याची भारताची नीती भारतासाठीच डोकेदुखी ठरण्याची शक्यता अधिक आहे.
एक गोष्ट नक्की आहे की, जोपर्यंत रशियावर पुतीन किंवा पुतीन समर्थक नेत्यांचे राज्य आहे तोपर्यंत अमेरिका आणि रशिया संबंध सुधारण्याची शक्यता नाही. सध्या पाश्चिमात्य जग अमेरिकेच्या बाजूने असल्यामुळे अमेरिकेचे पारडे जड आहे. पण अमेरिकेला पश्चिमेचा पाठिंबा भविष्यात किती दिवस राहतो यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. सदर युद्धामुळे अमेरिका आणि रशिया या राष्ट्रांमध्ये जी दरी वाढली आहे ती भारतासाठी निश्चितच चिंतेची बाब आहे.
स्वप्निल श्रोत्री