बांका – बिहारमधील बांका जिल्ह्यातून हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सासरवाडीत जात असताना विजेच्या खांबाला धडक बसून एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. या तरुणाचा 10 दिवसापुर्वीच 28 एप्रिल रोजी विवाह झाला होता. घरात लग्नाचा उत्साह असतानाच दु:खाचा डोंगर कोसळा आहे. या घटनेमुळे दोन्ही कुटुंबात शोककळा पसरली.
दिपक कुमार, वय 27 असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून तो डोमो कुमारपूर गावातील रहिवासी होता. दीपक रविवारी रात्री उशिरा दारूच्या नशेत लग्नात मिळालेली नवीन बाईक घेऊन सासरच्या घरी जात होता. याचदरम्यान, शंभूगंज पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या किरणपूर गावातील भोला धरणाजवळ त्याची दुचाकी विजेच्या खांबाला धडकली यावेळी तो दारुच्या नशेत असल्याचेही बोलले जात आहे.
अपघाताची माहिती मिळताच शंभूगंज पोलिस स्टेशनचे अधिकारी पंकज राऊत यांनी पोलिस निरीक्षक इंद्रदेव यादव यांना घटनास्थळी पाठवले. जखमी अवस्थेतील तरुणाला प्रथम शंभूगंज सामुदायिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले, तेथे डॉ. शैलेंद्र यांनी त्याला मृत घोषित केले. यानंतर पोलिसांनी कुटुंबीयांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांमध्ये एकच खळबळ उडाली.