नवी दिल्ली- सरकारच्या वतीने ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स हा प्रयोग सुरू करण्यात आला आहे. हे नेटवर्क भारतातील पाच शहरांमध्ये सुरू करण्यात आले असून आगामी काळामध्ये राष्ट्रीय स्तरावर ही यंत्रणा लागू केली जाणार आहे.
यूपीआयमुळे भारतामध्ये डिजिटल व्यवहार ज्या पद्धतीने वाढले. त्याच प्रकारे भारतातील ई-कॉमर्स ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्सच्या मदतीने वाढविण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
यामुळे जागतिक पातळीवरील बड्या ई-कॉमर्स कंपन्यांच्या भारतातील प्रभावाला पायबंद घातला जाऊ शकेल असे समजले जात आहे. यासंदर्भात उद्योग आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, यूपीआयमुळे भारतातील डिजिटल व्यवस्थेत आमूलाग्र बदल झाले. आता भारतातील ई-कॉमर्स क्षेत्रांमध्ये अशाच प्रकारचा प्रयोग करण्यात येत आहे.
सध्या पाच मोठ्या शहरातील काही ग्राहक, विक्रेते आणि पुरवठादारासाठी हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. आगामी काळामध्ये हा उपक्रम वेगाने राष्ट्रीय पातळीवर वाढविण्यात येणार आहे. भारतात सध्या जागतिक पातळीवरील दोन ई-कॉमर्स कंपन्या कार्यरत आहेत. त्यांनी बाजारपेठेचा 50 टक्के वाटा बळकावला आहे. त्यामुळे या व्यापारावर त्यांचे नियंत्रण आहे.
या क्षेत्रामध्ये लोकशाही आणण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सध्या देशातील 80 आस्थापना या नव्या यंत्रनेबरोबर काम करीत आहेत. दिल्ली, बंगळुरू, भोपाळ, सिलॉंग, आणि कोईमतूरमध्ये ही यंत्रणा सुरू करण्यात आली असून यामध्ये 150 रिटेलर सहभागी आहेत. या 5 शहरातील कामाचा अभ्यास केला जात असून या यंत्रणेमध्ये त्या आधारावर आवश्यक ते बदल करण्यात येतील. देशातील तीन कोटी विक्रेते आणि एक कोटी रिटेल व्यापाऱ्यांना ऑनलाइन प्रक्रियेत समाविष्ट करून घेण्यात येईल. पुढील सहा महिन्यांमध्ये इतर 100 शहरांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येईल. या ऍपमध्ये इंग्रजी भाषेबरोबरच स्थानिक भाषेचा प्रयोग करण्यात येणार आहे. या उपक्रमांमध्ये देशातील 20 कंपन्यानी व संघटनांनी 255 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.