अस्वच्छता आणि गैरसोयींमुळे मृतांच्या नातेवाईकांना मनस्ताप
सर्वच कामगार कंत्राटी तत्वावर
पुणे – नवी पेठेतील वैकुंठ स्मशानभूमीही अस्वच्छतेच्या गर्तेत सापडली आहे. अपुरे मनुष्यबळ, नियमित स्वच्छता न होणे तसेच आयत्यावेळी आवश्यक असलेले साधने न मिळाल्याने अंत्यविधीसाठी आलेल्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. तसेच अंत्यविधीसाठी रात्री-अपरात्री ताटकळत रहावे लागत आहे.
वैकुंठ स्मशानभूमी येथे महापालिकेने सर्व कर्मचारी ठेकेदारी पद्धतीने नेमले आहेत. मात्र, या कर्मचाऱ्यांना वेळेत वेतन न मिळणे, ईपीएफ व ईएसआयसी भरला जात नाही, अशा तक्रारी हे कर्मचारी अंत्यविधीसाठी आलेल्या नातेवाईकांकडेच करत आहेत. दरम्यान, येथे कोणत्याही असुविधा नसल्याचा दावा करण्यात आला असून, कर्मचाऱ्यांच्या तक्रारींबाबत चौकशी केली जाणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
या ठिकाणी पारंपारिक पद्धतीसह विद्युत दाहिनी, गॅस दाहिनीवर अंत्यसंस्कार केले जातात. यापूर्वी वैकुंठ स्मशानभूमीत आरोग्य विभागाचे कर्मचारी होते, पण आता ठेकेदारी पद्धतीने कर्मचारी नियुक्त केले जात आहेत. तीन शिफ्टसाठी 14 कर्मचारी नियुक्त केले आहेत.-
वैकुंठ स्मशानभूमीमध्ये जाणे झाले, त्यावेळी अंत्यविधीला वेळ होत असल्याचे जाणवले. पण, तेथे अपुरे कर्मचारी असल्याने तेथे योग्य पद्धतीने सेवा मिळत नाही. तेथील कामगारांना वेळेवर पगार मिळत नाही. ईपीएफ, ईएसआयसी सुविधेतही तफावत आहे. येथील शेडमध्ये अस्वच्छताही आहे. महापालिकेने येथील व्यवस्था सुधारण्याकडे लक्ष दिले पाहिजे.
– लक्ष्मीकांत खाबिया, शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान
ठेकेदाराकडून पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध केले आहे. या कर्मचाऱ्यांना वेतन वेळेवर दिले जाते. ईपीएफ व ईएसआयसी सुविधेची तपासणी केली जाईल. मात्र, अद्याप प्रशासनाकडे कोणतीही थेट तक्रार आलेली नसून नागरिकांनी आमच्याशी संपर्क साधावा.
– श्रीनिवास कंदुल, विद्युत विभाग प्रमुख