मुंबई- एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्तेंच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर सदावर्तेंच्या पत्नी जयश्री पाटील यांनी शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार व गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आम्ही पवार कुटुंबियांच्या विरोधात भ्रष्टाचाराची तक्रार दाखल केल्याने आमच्यावर दबाव टाकण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे जयश्री पाटील म्हणाल्या.
माझ्या पतीच्या जीवाला जर काही बरं वाईट झाले तर त्यासाठी शरद पवार, अजित पवार, दिलीप वळसे-पाटील जबाबदार असतील. या तिघांकडून माझ्या पतीच्या जीवाला धोका आहे, असा गंभीर आरोप जयश्री पाटील यांनी केला आहे.
दरम्यान, कसलीही माहिती न देता त्यांना अटक करण्यात आली. अतिरेकी असल्यासारखे त्यांना घरातून घेऊन गेले. मला त्यांना भेटूही देत नाही. शरद पवार यांचे हे षडयंत्र आहे. ते ताकदीचा चुकीचा वापर करत आहेत, असा घणाघाती आरोप देखील जयश्री पाटील यांनी केला आहे.