मुंबई – आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात सलामीच्या लढतीत पराभूत होण्याची परंपरा मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यातही कायम राखली. मात्र, मुंबईला या स्पर्धेच्या इतिहासात पाच वेळा सलामीच्या सामन्यांत पराभूत झाल्यावरही विजेतेपदावर नाव कोरता आले आहे, त्यामुळे हा पराभव शुभसंकेतच आहे, असे आकडेवारीवर नजर टाकली तर लक्षात येते.
ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सला दिल्ली कॅपिटल्सकडून पराभव स्वीकारावा लागला होता. मुंबईचा विजय निश्चित मानला जात असतानाच दिल्लीच्या अक्सर पटेल आणि ललित यादव यांनी 30 चेंडूत 75 धावांची भागीदारी करून दिल्लीला रोमहर्षक विजय मिळवून दिला होता.
यापूर्वी पाच मोसमांत सलामीच्या सामन्यात पराभव झाल्यानंतरही मुंबई इंडियन्सने पाच वेळा आयपीएल स्पर्धा जिंकली होती. त्यामुळे मुंबईच्या यंदाच्या सहाव्या विजयाचा विश्वासही अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केला आहे.