नवी दिल्ली – काश्मिरी पंडीतांच्या पुनर्वसनासाठी सरकारने 20 हजार कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांनी केली आहे.
दिल्ली सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पाचा संदर्भ देऊन सिंह यांनी ही मागणी केली. काश्मिरी पंडीतांच्या पुनर्वसनासाठी सरकारने अर्थसंकल्पात 20 हजार कोटी रुपयांची तरतूद करावी. त्यासाठी सर्व खासदारांनी आपल्या खासदार निधी वर्षभरासाठी काश्मिरी पंडीतांच्या पुनर्वसनासाठी द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
राज्यसभेमध्ये वित्त विधेयक 2022 वर चर्चेदरम्यान संजय सिंह यांनी भाजप प्रदेशाध्यक्षांकडून मुख्यमंत्र्याकडून झालेल्या अपशब्दांचा संदर्भ दिला आणि भाजप, संघाच्या संस्कृतीबाबतही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यामुळे संजय सिंह आणि भाजप खासदार जीव्हीएल नरसिंहा राव यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली.
सिंह यांची टिप्पणी कामकाजाच्या नोंदीतून काढून टाकण्याची मागणी राव यांनी पीठासीन अधिकाऱ्यांकडे केली. पीठासीन अधिकारी असलेल्या तृणमूलचे खासदार सुखेंदु सेखर रॉय यांनीही तसे आश्वासन दिले. मात्र तरिही सिंह आणि राव यांच्यातील खडाजंगी सुरू राहिली.