प्रा. नितीन मटकरी
संत सोपानदेव, संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानदेव या तिन्ही भावांची बहीण म्हणजे संत मुक्ताबाई. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरपासून जवळच कोथळी या गावी मुक्ताबाईंचे प्राचीन मंदिर आहे. त्याचप्रमाणे मुक्ताईनगर येथेही मुक्ताबाईंचे मंदिर आहे. तेथे नुकतीच यात्रा संपन्न झाली. तेथे भरणारी यात्रा ही वारकरी संप्रदायातील वारकऱ्यांसाठी पर्वणीच असते. कारण या यात्रेचे स्वरूप जवळच असलेल्या चांगदेव या तीर्थक्षेत्रापर्यंत विस्तारलेले असते. चांगदेव म्हणजे योगीराज चांगदेव महाराजांची तपोभूमी. तापी-पूर्णा संगमावर चांगदेवांनी 1400 वर्षे तप केले. तेथे आजही चांगदेवाचे हेमाडपंती मंदिर आहे.
येथून पुढे श्रीक्षेत्र मेहूण आहे. येथे संत मुक्ताई तिरोभूत झाल्या व आपले अवतार कार्य संपविले. येथेही मुक्ताईंचे मंदिर आहे. विविध ठिकाणांवरून दिंड्या, पायी वाऱ्या, भाविक, भक्त या निमित्ताने कोथळी येथे मुक्ताई मंदिरात येतात व मुक्ताई चरणी लिन होतात तो पर्वणी काळ महाशिवरात्रीपर्यंत सुरू असतो. आपल्या योगसिद्धीचा चांगदेवांना गर्व झाला. त्यांचे गर्वहरण मुक्ताईंनी केले म्हणून चांगदेवांनी मुक्ताईंना गुरू मानले. संत नामदेव महाराजांनीही मुक्ताईंना गुरू मानले. जननिंदा, अवहेलना यामुळे व्यथित झालेल्या व स्वतःला बंदिस्त करून घेतलेल्या ज्ञानेश्वर माऊलींना मुक्ताबाईंनी केलेला उपदेश म्हणजे ताटीचे अभंग-
संत जेणे व्हावे।
जग बोलणे सहावे ।।1।।
तरीच अंगी थोरपण।
जया नाही अभिमान।।2।।
थोरपण जेथे वसे ।
तेथे भूतदया असे।।3।।
रागे भरावे कवणासी ।
आपण ब्रह्मसर्व देशी ।।4।।
ऐशी समदृष्टी करा ।
ताटी उघडा ज्ञानेश्वरा ।।5।।
या प्रमाणे मुक्ताईंनी ज्ञानदेवांना उपदेश केला. कुठल्याही परिस्थितीसमोर न हारता परिस्थितीवर कशी मात करावी, जननिंदा, लोक काय म्हणतील याचा विचार न करता आपणच ब्रह्म सर्व देशी हा मुक्ताईंचा उपदेश ज्ञानेश्वर माऊलींना सकारात्मक ठरला. त्यातूनच सार्थ ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, हरिपाठ व वैश्विक ठरलेले पसायदान ही अमूल्य देणगी अध्यात्मशास्त्रास मिळाली.