नवी दिल्ली – देशातील पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या गुरुवारी होत आहे. त्या विषयी देशभर कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. पंजाब, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यात या निवडणुका झाल्या आहेत.दरम्यान, पाच राज्यांच्या निवडणुकीच्या मतमोजणीस सुरुवात झाली आहे. थोड्याच वेळात पाहिलं कल समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पाचही राज्यातील मतमोजणी सकाळपासून सुरू झाली आहे. त्यासाठी ठिकठिकाणी निवडणूक आयोगाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. सर्वत्र मतपेट्या कडक बंदोबस्तात तैनात ठेवण्यात आल्या आहेत. उत्तरप्रदेश आणि अन्य काही ठिकाणी राजकीय पक्षांचे कार्यकर्तेही ईव्हीएम मशीन्स ज्या गोदामात ठेवण्यात आल्या आहेत तेथे पाळत ठेऊन आहेत. उत्तर प्रदेशात काही ठिकाणी मतपेट्यांच्या वाहतुकीतील ढिलाईवरून जोरदार वादंग सध्या माजले आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वत्र विशेष दक्षता घेतली गेली आहे.
पाच राज्यांच्या मतदानाच्या एक्झिट पोलचे निकाल कालच जाहीर झाले आहेत. त्यानुसार उत्तरप्रदेशात भारतीय जनता पक्षाचेच सरकार येणार आहे. गोवा आणि मणिपूर मध्ये त्रिशंकू स्थिती निर्माण होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला असून उत्तराखंडमध्ये भाजप आणि कॉंग्रेसमध्ये काट्याची टक्कर होणार असल्याचे दिसून आले आहे.
दरम्यान, ज्या राज्यांमध्ये त्रिशंकू स्थिती होणार असल्याचे भाकीत वर्तवण्यात आले आहे त्या राज्यांत राजकीय पक्षांच्या हालचाली आधीपासूनच सुरू झाल्या आहेत. कॉंग्रेसने गोव्यातील उमेदवार सुरक्षित ठिकाणी हलवले असल्याच्या बातम्या आल्या आहेत. तर उत्तराखंडमध्येही तशीच खबरदारी कॉंग्रेसकडून घेतली जात आहे. पाचही राज्यांमध्ये कॉंग्रेसने निरीक्षकही पाठवले आहेत. भाजपने निवडणूक निकालाबाबतची रणनिती निश्चित केली असून त्यांनीही गोवा आणि उत्तराखंडबाबत अधिक जागरूकपणे आपली व्युवहरचना केली आहे.