पुणे (विजयकुमार कुलकर्णी) –रशिया-युक्रेन युद्ध, वाढती महागाई, घटलेली आवक आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाचा होणाऱ्या घसरणीचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर झाला आहे. 15 दिवसांत सोन्याच्या भावात तोळ्यामागे तब्बल 6 हजार रुपयांनी वाढ झाली आहे. पंधरा दिवसांपूर्वी 47 हजार रुपये तोळा असलेले सोने आता 53 हजार रुपयापर्यंत पोहोचले आहे.
गुंतवणूक आणि हौस
भारतात लग्नसमारंभ अथवा कोणत्याही शुभ कार्यावेळी सोने खरेदी केली जाते. अंगावर दागिने घालण्याची भारतीयांना आवड आहे. आता तर लोक सोन्याकडे गुंतवणूक म्हणून पाहू लागले आहेत. कमी कालावधीत जास्त परतावा मिळत आहे. त्यातच आता करोना प्रतिबंधक नियम शिथिल झाल्याने अनेक उत्सव आणि लग्न सोहळे पूर्वीप्रमाणे सुरू झाले आहेत. त्यामुळे सोन्याची मागणी वाढत आहे.
“असलेले सोने विकू नका’
भाववाढीमुळे भारतात सोन्याला सध्या अपेक्षित मागणी नाही. तर सोने पुन्हा उतरेल का, असलेले सोने विकून नफा मिळवावा का, अशी विचारणा काही नागरिक करत आहेत. मात्र, असलेले सोने विकू नका. तसे करणे सामान्य नागरिकांना फायदेशीर ठरणार नाही, असे या क्षेत्राशी संबंधित तज्ज्ञ सांगत आहेत.
सोने महागण्याची प्रमुख कारणे
देशात सोने पूर्णत: परदेशांतून येत असते. मागील काही दिवसांपासून रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाले आहे. शेअर बाजार अस्थिर झाला आहे. सोन्याच्या किंमतीवर मोठा परिणाम झाला आहे. जगातील अनेक देशातील नागरिक शेअर बाजारापेक्षा सोने खरेदी करण्यास पसंती देत आहेत. त्यामुळे सोन्याची किंमत वाढत आहे.
महागाई वाढतच चालली आहे. त्या प्रमाणात सोने वाढत आहे. पैसे असल्यास नागरिकांनी सोन्यात गुंतवणूक करण्यास हरकत नसून, ही गुंतवणूक फायदेशीरच ठरणार आहे. मात्र, जवळ पैसे नसल्यास कर्ज काढून सोन्यात गुंतवू नयेत.
– फत्तेचंद रांका, अध्यक्ष, पुणे सराफ असोसिएशन.