पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल यंदा विशेष औत्सुक्याचे आहेत. कारण ज्या राज्यांमध्ये ही मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्या पाचपैकी चार राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टी सत्तेवर आहे. या पक्षाला जनमतावरील आपले प्रभुत्व टिकवता आले आहे की नाही, याचा कल या निवडणुकांच्या निकालावरून दिसून येणार असल्याने त्याच्या निकालाला महत्त्व आहे. कालच या पाचही राज्यांतील एक्झिट पोलचे निकाल आले आहेत. अर्थात अलीकडच्या काळात एक्झिट पोलवर शंभर टक्के विसंबून राहता येणार नाही, असे अनेक वेळा स्पष्ट झाले असल्याने त्यावर फार भरवसा न ठेवताही एकूण जे चित्र समोर आले आहे ते मात्र भाजपला सुखावणारे आहे. पंजाब वगळता उर्वरित चारही राज्यांमध्ये भाजपला पुन्हा सत्ता स्थापन करण्यास संधी आहे असेच हा एक्झिट पोल सांगतो आहे. कॉंग्रेसच्या ताब्यात असलेले पंजाब राज्य मात्र त्यांच्या हातून सुटून आम आदमी पक्षाकडे जाईल, असे एकमुखी भाकित सर्वच संस्थांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे हा निकाल आम आदमी पक्षासाठी महत्त्वाचा आहे.
देशाच्या राजकारणात आम आदमी पक्ष हा एक नवीन दमदार पर्याय वेगाने उभा राहतो आहे याचेच हे लक्षण मानावे लागेल. सन 2012 साली या पक्षाची स्थापना झाली आणि यंदा या पक्षाला जेमतेम दहा वर्षे पूर्ण होत असताना हा पक्ष दोन राज्यांमध्ये प्रचंड बहुमताने सत्तेवर असणारा पक्ष ठरणार आहे. तसेच या पक्षाला अन्यही राज्यांमध्ये काही जागा मिळणार असल्याचे या एक्झिट पोलमधून दिसून आल्याने आम आदमी पक्षाला लवकरच राष्ट्रीय पक्ष म्हणूनही मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. आम आदमी पक्षाला पंजाबात एकहाती सत्ता मिळण्याचा आणखी एक अन्वयार्थ असा लावता येईल की, पूर्ण राज्याचा दर्जा असलेले एक राज्य त्यांना मिळणार आहे. त्यामुळे त्यांची जी वेगळी प्रशासन शैली आहे त्याचा प्रयोग त्या राज्यात कितपत यशस्वी ठरणार हे सर्वांनाच पाहायला मिळणार आहे. दिल्लीत त्यांचे एकहाती सरकार असले तरी मोदी सरकारने त्यांचे सारे अधिकार काढून घेऊन हे राज्य पूर्णपणे तेथील नायब राज्यपालांच्या हाती दिले आहे. म्हणजेच दिल्लीला आता स्वतंत्र राज्याचा केवळ नाममात्र दर्जा उरला आहे.
त्यामुळे त्यांना मोकळेपणाने काम करण्यात बऱ्याच अडचणी आहेत. त्यांचे सारेच प्रस्ताव केंद्र किंवा राज्यपालांच्या मंजुरीशिवाय पुढे सरकू शकत नाहीत आणि भाजपचे लोक केजरीवालांना काम करू देत नाहीत असेच आजवर दिसून आले आहे. प्रत्येक बाबतीत केजरीवालांना झगडावे लागते आहे; परंतु अशाही परिस्थितीत त्यांनी दिल्लीत चांगले काम करून दाखवले आहे. आता त्यांची खरी कसोटी पंजाबमध्ये सरकार चालवताना दिसून येईल. दुसरा महत्त्वाचा निकाल उत्तर प्रदेशचा आहे. हे राज्य भाजपच्या हातून निसटले असते तर त्यांचे राजकीय भविष्य दोलायमान होऊ शकले असते पण साऱ्याच संस्थांनी उत्तर प्रदेशात पुन्हा भाजपचेच सरकार सत्तेवर येईल असे एकमुखी भाकित वर्तवले असल्याने भाजपला आता फार चिंता करण्याचे कारण राहणार नाही. अर्थात, भाजपच्या उत्तर प्रदेशातील जवळपास शंभर एक जागा कमी होणार असल्याचेही यातून दिसून आले असले, तरी बहुमताचा आकडा आरामात पार करता येईल एवढे संख्याबळ त्यांना तिथे मिळेल असा सारा रागरंग आहे.
समाजवादी पक्षाने जोरदार हवा केली असली तरी त्यांना अपेक्षित यश तेथे गाठता येणे अवघड आहे, असे या एक्झिट पोलचा निष्कर्ष सांगतो आहे. अर्थात, समाजवादी पक्षाचा या पोलवर विश्वास नाही, त्यांना तेथे आपलेच सरकार येईल अशी खात्री वाटते आहे. कोणताही राजकीय नेता प्रत्यक्ष मतमोजणी पूर्ण होऊन स्पष्ट निकाल हाती येईपर्यंत असेच म्हणत असतो आणि ते अगदी स्वाभाविक आहे. एक्झिट पोल म्हणजे सर्वस्व किंवा अंतिम सत्य नसते हेही त्यांच्यासाठी खरे असते. उत्तर प्रदेशच्या या निवडणुकीत कॉंग्रेसच्या कामगिरीविषयीही विशेष औत्सुुक्य होते; पण त्यांची प्रत्यक्ष निकालातील कामगिरी मात्र पुन्हा एकदा निराशाजनकच ठरणार असल्याचे चित्र आहे. त्यांना तेथे दोन अंकी संख्याही गाठता येणार नाही, असे सर्वच चाचण्यांमधून दिसून आले आहे. वास्तविक या निवडणूक प्रचारात प्रियंका गांधी यांनी झोकून देऊन काम केले होते; पण कॉंग्रेसचे तेथे केडरच अस्तित्वात नसल्याचा फटका त्यांना सोसावा लागला. तरीही त्यांनी तेथे काही वेगळे प्रयोग करून लोकांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यांच्या प्रचार सभांना आणि रोडशोला मोठी गर्दी होताना दिसली होती. पण ही गर्दी प्रत्यक्ष मतांमध्ये परावर्तीत होऊ शकली नाही. असे जरी असले तरी प्रियंकांचा प्रचाराचा पोत अत्यंत प्रगल्भ स्वरूपाचा होता.
उत्तर प्रदेशच्या प्रचारात चरबी आणि गरमीची भाषा सर्रास वापरली गेली; पण ही निवडणूक जनतेच्या खऱ्या समस्येच्या दिशेने वळवण्याचा प्रियंकांनी कसोशीचा प्रयत्न केला होता. महिलांना चाळीस टक्के तिकिटे देऊन त्यांनी उमेदवारही वेगळ्या स्वरूपाचे दिले होते. निवडणुकीत त्यांनी महिला व युवकांसाठी तसेच एकूण उत्तर प्रदेशसाठी वेगवेगळे जाहीरनामे प्रकाशित करून निवडणुकीत रंग भरला होता. त्यांना या निवडणुकीत अपेक्षित यश मिळू शकणार नसले तरी उत्तर प्रदेशच्या राजकारणात त्यांनी कॉंग्रेस पक्षाची पायाभरणी मात्र चांगली करून ठेवली आहे, त्याचा त्यांना भविष्यात लाभ झाल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रातील लोकांच्या दृष्टीने गोव्यातील निवडणुकाही महत्त्वाच्या मानल्या जातात.
तेथे मात्र भाजपच्या हातून सत्ता जाणार किंवा त्यांना स्पष्ट बहुमत मिळणार नाही असेच सर्व संस्थांचे भाकित असले तरी तेथेही नंबर वनचा पक्ष भाजपच राहील असा कौल मिळाला आहे. मागच्यावेळी दुसऱ्या क्रमांकाच्या जागा मिळूनही भाजपने फोडाफोडी करून गोव्यात सत्ता मिळवली होती. तीच कसरत त्यांना पुन्हा गोवा आणि मणिपुरातही करावी लागणार आहे. मात्र भाजपकडे या दोन्ही राज्यांमध्ये मोठे संख्याबळ असेल त्यामुळे त्यांना ही कसरत फार अवघड जाणार नाही, असे या पोलचे भाकित आहे. उत्तराखंडमध्येही भाजपचा जो एकतर्फी पराभव होईल असे सांगितले गेले होते तसे एक्झिट पोलवरून तरी दिसून येत नाही. त्यामुळे ही सारी आकडेवारी लक्षात घेतली तर ही निवडणूकही भाजपच्याच यशाने दुमदुमणार असे दिसते आहे.