पुणे – करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने लागू केलेले निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल होण्यास सुरुवात झाली आहे. येत्या काळात कोविड पूर्व काळाप्रमाणे रेल्वे कोचेसची रचना करण्यात येणार असून, याबाबत रेल्वे मंत्रालयाने रेल्वे विभागांना सूचना दिल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना सुविधेबरोबरच आर्थिक दिलासा देखील मिळणार आहे.
करोनामुळे मार्च २०२० पासून रेल्वेने प्रवास करण्यासाठी आरक्षण अनिवार्य असल्याची अट घातली होती. त्यामुळे जनरल तिकीटावर नागरिकांना प्रवास करता येत नव्हता. तर रेल्वेला विशेष क्रमांक दिल्याने सवलती देखील स्थगित केल्या होत्या. इतकेच नव्हे तर, तिकिटांचे दर देखील वाढले होते. मात्र आता करोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्याने आणि बहुतांश व्यवहार खुले झाल्याने रेल्वेने सेवा पूर्ववत करण्याची मागणी करण्यात येत होती.
सोमवारी रेल्वे मंत्रालयाने रेल्वे सेवा पूर्ववत करण्याबाबतचा निर्णय घेतला आहे. याबाबत सर्व विभागांना याबाबतच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. मात्र कोणत्या रेल्वेला कोचेस जोडायचे आणि केव्हापासून जोडायचे याबाबतचा निर्णय प्रलंबित आहे. कोणत्या रेल्वेला कोचेस जोडायचे याबाबतचा अंतिम आदेश झालेला नाही. आरक्षणाच्या स्थितीनुसार कोचेस जोडण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.