जयपूर -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन 2022 मध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाचे काय झाले असा सवाल राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी उपस्थित केला आहे. नरेंद्र मोदी सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन पूर्ण करण्यात सपशेल अपयशी ठरले आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
राजस्थान किसान आयोगाचे नवनियुक्त अध्यक्ष महादेव सिंह खंडेला यांनी आज पदभार स्वीकारलेला. त्यानिमित्त पंत कृषी भवनात गेहलोत पत्रकारांशी बोलताना हा सवाल केला.
ते म्हणाले की, पंतप्रधान शेतकऱ्यांचे उत्पन्न कसे दुप्पट करणार होते हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे. आम्हालाही या राज्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करायची आहे. त्यासाठी आम्ही अनेक योजना राबवल्या आहेत. मोदींच्या दुप्पट उत्पन्न योजनेची या राज्यातील शेतकऱ्यांनीही आतुरतेने वाट पाहिली होती, पण त्यांच्या पदरात केंद्र सरकारकडून काहींही पडले नाहीं असेही त्यांनी यावेळी नमूद केले. या पार्श्वभूमीवर राजस्थान सरकारने यंदा शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्पाचा निर्णय घेतला आहे असेही ते म्हणाले.