नवी दिल्ली – उत्तर प्रदेशमधील सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी निवडणूक प्रतिनिधींची भेट घेऊन विधानसभा निवडणुका वेळेवर घेण्याची विनंती केली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुका करोना आचारसंहिता सांभाळत वेळेत घेण्यात येतील, असे मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्र यांनी स्पष्ट केले.
निवडणुका होणाऱ्या राज्याच्या तीन दिवसांच्या दौऱ्यानंतर चंद्रा पत्रकारांशी बोलत होते. मतदारांची वाढलेली संख्या आणि करोनाची स्थिती यामुळे कोठेही गर्दी होऊ नये म्हणून आम्ही अधिक 11 हजार मतदान केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरमध्ये विधानसभेच्या निवडणुका पुढीलवर्षी होत आहेत. त्यासंदर्भात मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले, मतदारयादी पाच जानेवारीला जाहीर करण्यात येणार आहे. तसेच नियोजित दिवशी आठ ते सहा वेळेत मतदान घेण्यात येईल. सामाजिक अंतर पाळण्यासाठी मतदानाची वेळ उत्तर प्रदेशमध्ये एक तासाने वाढवण्यात आली आहे. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावरील मतदारांची संख्या 1,500 वरून घटवून 1250 करण्यात आली आहे.
सर्व म्हणजे सुमारे एक लाख बूथवर व्हीव्हीपॅट यंत्रे बसवण्यात येईल. मतदानाची पारदर्शकता ठेवण्यासाठी सर्व मतदान केंद्रावर वेबकासिंटगची सुविधा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
निवडणुकीत 80 वर्षांवरील व्यक्ती, अपंग आणि करोना संसर्गित आणि मतदान केंद्रावर येणे अशक्य असणाऱ्या मतदारांपर्यंत निवडणूक आयोग पोहोचेल, असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, जनजागरणामुळे सुमारे 28 लाख 86 हजार महिलांची भर पडली. हे प्रमाण पुरुषांपेक्षा पाच लाखांनी अधिक आहे.