लखीमपुर- केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचे पुत्र आशिष मिश्रा यांच्याकडूज जी रायफल जप्त करण्यात आली आहे त्यामधूनच लखीमपूर खेरीतील शेतकऱ्यांवर गोळीबार करण्यात आल्याचा दावा फॉरेन्सिक अहवालात सिद्ध झाला आहे.
आशिष मिश्रा याने शेतकऱ्यांना गाडीखाली तर चिरडलेच; पण त्यांना विरोध करण्यासाठी पुढे आलेल्या शेतकऱ्यांवर त्याने गोळीबारही केल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला गेला होता.
आशिष मिश्राकडे सापडलेल्या शस्त्रातूनच गोळीबार करण्यात आल्याचा मुद्दा या अहवालातून स्पष्ट झाला आहे. पण घटनेच्या दिवशीच या शस्त्रातून गोळीबार करण्यात आला होता किंवा कसे यावर मात्र या अहवालात कोणतीही स्पष्टता नाही.
दरम्यान शेतकऱ्यांनी केलेल्या हल्ल्यात जे पत्रकार ठार झाले त्या रमन कश्यप यांचे बंधी पवन कश्यप यांनी कोर्टात धाव घेऊन या हत्या प्रकरणात आशिष मिश्रा आणि अन्य चौदा जणांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे.लखीमपूरच्या 3 ऑक्टोबर रोजी झालेल्या घटनेत एकूण आठ जण ठार झाले आहेत.
त्यातील चार जण आशिष मिश्रा यांच्या गाडीखाली चिरडून ठार झाले तर शेतकऱ्यांनी केल्या हल्ल्यात भाजपचे दोन कार्यकर्ते आणि त्यांच्या गाडीचा चालक ठार झाला आहे.
आशिष मिश्रा आणि त्याच्या साथीदाराकडून एकूण चार शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. त्यात रायफल आणि रिव्हॉल्वरचाही समावेश आहे. यातील सत्यप्रकाश नावाच्या इसमाकडे सापडलेल्या शस्त्राचा फॉरेन्सिक अहवाल मात्र अजून प्राप्त व्हायचा आहे.