नवी दिल्ली – लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी विरोधी पक्षांनी मिळून संसद भवन ते विजय चौक असा मोर्चा काढला आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्ष करत आहेत. काँग्रेस नेते आणि पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधीही यामध्ये सहभागी झाले आहेत. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, पुन्हा एकदा विरोधी पक्ष एकवटले असून लखीमपूर खेरी प्रकरण उचलून धरणार आहे.
राहुल गांधी म्हणाले की, “आम्ही वारंवार सांगितले आहे की असा एक मंत्री आहे ज्याच्या मुलाने शेतकऱ्यांना मारले, जीपखाली चिरडले. हे षड्यंत्र असल्याचे वृत्त समोर आले आहे. त्या मंत्र्याबद्दल पंतप्रधान काहीच बोलत नाहीत. सरकार आपले काम करत नाही. भारतातील एका मंत्र्याच्या मुलाने शेतकर्यांना चिरडण्याचे काम केले आहे, हे सत्य आहे.”
ते पुढे म्हणाले, “पंतप्रधान म्हणतात की मी शेतकऱ्यांची माफी मागतो. दुसरीकडे शेतकऱ्याच्या मारेकऱ्याला ते आपल्या मंत्रिमंडळात ठेवतात. त्यांना मंत्रीमंडळातून काढत नाहीत. त्यामुळे सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. शेतकर्यांच्या विरोधात, भारतातील सर्वसामान्यांच्या विरोधात जे काही केले जात आहे, त्यासाठी आम्हाला हा संदेश द्यायचा आहे. आम्ही ते मान्य करणार नाही.”