आमदारपदाची एकूण 14 वर्षे चंद्रकांतदादा पाटील पूर्ण करताहेत. 12 वर्षे विधानपरिषदेचे पदवीधर मतदारसंघातील आमदार, 5 वर्षे महसूल, सार्वजनिक बांधकामसह विविध खात्यांचे कॅबिनेट मंत्रिपद, महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या मातब्बर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, एवढी सर्व भक्कम पार्श्वभूमी असलेला नेता असूनही जमिनीवरून पाय अजिबात न सुटलेला नेता ही दादांची ओळख आहे. चंद्रकांतदादा पाटील कोथरूड मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आल्यानंतर एका कार्यक्षम, विचारांशी पक्की बांधिलकी असलेला आणि अत्यंत साधी राहणी असलेला आमदार अनुभवता येतो आहे. आमदार सेवाकार्यात गढून गेला आहे, असे विरळा चित्र कोथरूडमधील मतदारांनी करोनाच्या काळात अनुभवले. चंद्रकांतदादा पाटील करोनामुळे अडचणीत असलेल्या प्रत्येक घटकासाठी काम करताना दिसत होते.
कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा विचारही चंद्रकांतदादांच्या मनात नव्हता; परंतु पक्षश्रेष्ठींनी त्यांना कोथरूडमधून लढण्याचा आदेश दिला आणि नेत्यांची इच्छा हीच आज्ञा अशी भावना ठेवून कृती करणाऱ्या चंद्रकांतदादांनी कोथरूडची उमेदवारी स्वीकारली. संपूर्ण प्रांताची जबाबदारी सांभाळून त्यांनी कोथरूडच्या मतदारांशीही संपर्क साधला. अत्यंत साधी राहणी, वागण्या-बोलण्यातील नम्रता, चेहऱ्यावर कायम विलसत असलेले हास्य, कार्यकर्ता किंवा कोणत्याही कुटुंबाशी संवाद करताना त्यात असलेली ऋजूता प्रत्येकच जण अनुभवत होता.
राजकीय नेत्याचे अभावाने आढळणारे व्यक्तिमत्त्व कोथरूडकर पाहात होते. कोथरूडची निवडणूक अचानक महाराष्ट्रातील सर्वात हायप्रोफाइल लढत बनली. त्यामुळे भाजपाच्या या मातब्बर उमेदवाराला खिंडीत पकडण्यासाठी सारे विरोधक जुंपले गेले. कोथरूड हा हिंदुत्वाच्या विचारांचा असलेला मतदारसंघ आहे, भाजपा आणि येथील मतदारांचे घट्ट आणि खोलवर रूजलेले नाते आहे, याचा विरोधकांना विसर पडला. कोथरूडमधील आजवरची सर्वाधिक म्हणजे 53 टक्के मते मिळवून दादा विजयी झाले. हा विजय विचारांवर श्रद्धा असलेल्या मतदारांनी विचारांशी बांधिलकी असलेल्या व्यक्तीला दिलेली दाद होती.
प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीमुळे राज्यभर फिरावे लागणारच, पण त्यामुळे मतदारसंघातील नागरिकांप्रतीचे कर्तव्य चुकणार नाही, यासाठी दादांनी व्यवस्था उभी केली. मतदारसंघात किती दिवस द्यायचे, मतदारसंघात किती जनसंपर्क कार्यालये असायला हवी, याचे नियोजन केले गेले. मतदारसंघात निमंत्रण दिल्या गेलेल्या प्रत्येक कार्यक्रमास दादा उपस्थित राहतात. कार्यक्रम छोटा की मोठा असा विचार न करता, दादा कार्यक्रम स्वीकारतात. त्यांच्या प्रत्येक भेटीत काही घरांमध्ये जाउन संपर्क साधतात. त्यामुळे दादांच्याविषयी आपलेपणाची भावना मतदारसंघातील नागरिकांच्या मनात तयार झालेली आहे.
दुर्दैवाने आमदाराकीच्या या दोन वर्षात पावणेदोन वर्षे करोनाच्या आपत्तीनेच घेतले. यावेळी सेवा हा राजकारणात येण्याचा प्रेरणास्रोत असलेल्या दादांनी झोकून देत काम केले. कोथरूड मतदारसंघच नव्हे तर महाराष्ट्रातील प्रत्येक गावात पक्ष कार्यकर्त्यांनी करोनाच्या अभूतपूर्व परिस्थितीत जनतेच्या सेवेसाठी उतरावे, असा आग्रह धरला आणि त्यातून महाराष्ट्रात सेवा ही संघटन अंतर्गत मोठ्या प्रमाणात काम केले गेले. दादांनी फ्रंटलाईन वर्कर आणि सामान्य नागरिकांना एक लाखाहून अधिक मास्कचे वाटप कोथरूड मतदारसंघात केले. कोथरूडमधील अनेक ज्येष्ठांना करोनाच्या काळात स्वयंपाक करून देणाऱ्यांची सेवा मिळणे बंद झाले.
पुण्याबाहेरचे हजारो विद्यार्थी आणि नोकरदारांना जेवण उपलब्ध होण्यात अतोनात अडचणी येऊ लागल्या. या समस्येची तातडीने दखल घेऊन दादांनी ज्यांनी पैसे देणे शक्य आहे, त्यांच्याकडून पाच रुपये आणि ज्यांना शक्य नाही त्यांना मोफत पोळीभाजी वितरण सुरू केले. दररोज जवळपास अडीच हजार जणांना जेवणाचा डबा पाठविण्यास सुरुवात केली. हजारो कुटुंबांना शिधावाटप केले. कोविड केअर सेंटर उपलब्ध होणे, ही नागरिकांची खूप मोठी गरज होती. उत्तम सुविधा, योग्य निगा आणि सेवा देणारे कोविड केअर सेंटर दादांच्या पुढाकाराने हिंजवडी येथे सुरू झाले.
104 बेडसचे हे सेंटर आदर्श ठरले. पुण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच अनेक संघटनांच्या कोविड केअर सेंटरसाठी आरोग्य उपकरणांची मदत दादांच्या पाठबळामुळे उपलब्ध झाली. लॉकडाऊनच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. दादांनी नोकरी गेलेल्या घरातील व्यक्तीसाठी महिनाभर नोकरी, त्यासाठी पाच हजार रुपये वेतन आणि रेशन देण्याचा उपक्रम चालविला. दादांनी त्यांचा वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा करीत वाढदिवसाला भेट द्यायचीच असेल तर जमेल त्या रिक्षाचालकाला “सीएनजी कूपन द्या आणि त्याच्या व्यवसायाला हातभार लावा’ असे आवाहन केले. त्या आवाहनानुसार 10 हजारांहून अधिक रिक्षाचालकांना 300 रुपयांचे सीएनजी इंधन मोफत मिळाले.
कोथरूडमधील प्रवेशद्वार असलेल्या चांदणी चौक उड्डाणपुलाचे काम पूर्ण होण्यासाठी दादा सातत्याने प्रयत्नशील आहेत. बाणेर, पाषाण, बालेवाडी या भागात मोठ्या प्रमाणात वस्ती वाढते आहे, तेथील पायाभूत सुविधा बळकट होण्यासाठी दादा सातत्याने प्रयत्नशील आहेत. या भागातील राम नदीचे पुनरूज्जीवन होण्यासाठी दादांनी पुढाकार घेतलेला आहे. हा पुढाकार घेताना त्यात पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे योगदान राहील यावरही त्यांचा कटाक्ष असतो. कोथरूड मतदारसंघातील वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या डीपी रस्ता व पुलाचे काम पूर्ण होण्यासाठी दादांनी पाठपुरावा केला.
आज त्याचे लोकार्पणही झालेले आहे. महात्मा सोसायटीतील विकास रस्त्याचेही काम त्यांनी लक्ष घालून पूर्ण केले. मतदारसंघातील नाल्यांची सफाई करणे, त्या नाल्यामध्ये पाणी तुंबू नये म्हणून कायमस्वरूपी उपाययोजना करणे, नाल्यांना सीमाभिंती बांधणे यावरही दादांनी भर दिलेला आहे. विकास आराखड्यातील रस्ते तातडीने मार्गी लावल्यास संभाव्य अतिक्रमण तर थांबतेच पण त्याचबरोबर नागरिकांना सुविधाही पटकन उपलब्ध होते, हे लक्षात घेऊन दादा त्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात.
सामाजिक कार्याला नैतिक आणि वैचारिक बैठक लागते. दादांच्याकडे या दोनही गोष्टी आहेत. त्यामुळेच पुण्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता असतानाही एकही भ्रष्टाचाराचा आरोप होऊ शकला नाही. अनेक भांडवली खर्चाचे मोठे प्रकल्प सुरू आहेत, ते प्रकल्प वेगाने चालू आहेत. मेट्रो प्रकल्प अंतिम टप्प्यात आलेला आहे.
24-7 पाणीपुरवठा योजना प्रगतीपथावर आहे. भामाआसखेड प्रकल्प पूर्णत्वास गेलेला आहे. पीएमपीएमएल प्रवासी केंद्रित होत आहे आणि पर्यावरणस्नेही बनलेली आहे. दादांनी पुण्यामध्ये आपला जीव ओतलेला आहे, हे पुणेकर अनुभवत आहेत. कोथरूडच्या आमदारकीची दोन वर्षे पूर्ण करणाऱ्या दादांना शुभेच्छा!
श्री. विनय गानू
चार्टर्ड अकौंटंट