मुंबई – राज्यातील 6 जिल्ह्यांमध्ये 5 ऑक्टोबरला झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीची आज (6 ऑक्टोबर) मतमोजणी झाली. नागपूर, पालघर, धुळे, नंदूरबार, अकोला आणि वाशिमच्या जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला. जिल्हा परिषदेच्या एकूण 85 जागांपैकी महाविकास आघाडीने 46 जागा जिंकत सत्ता राखली. मात्र, भाजपला सर्वाधिक 23 जागा मिळाल्या आहेत.
जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत सर्वच पक्ष स्वबळावर लढले होते. अपवादात्मक ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली होती. तर मनसे आणि भाजपचीही युती झाली होती. मात्र, एकंदरीत सर्वच ठिकाणी प्रत्येक पक्षाने आपआपले बळ दाखवले होते.
जिल्हा परिषदेच्या 85 जागांपैकी 23 जागांवर भाजपने दणदणीत विजय मिळवून आपणच राज्यात नंबर वन असल्याचे दाखवून दिले आहे. तर कॉंग्रेसने 17, राष्ट्रवादीने 17, शिवसेनेने 12 आणि इतरांनी 16 जागांवर विजय मिळविल आहे. तर आघाडी आणि युतीनिहाय आकडेवारी पाहता महाविकास आघाडीने 46, भाजपने 23 आणि इतरांनी 16 जागांवर विजय मिळविला आहे.
भाजप-मनसे युतीचा प्रयत्न फसला
पालघर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत एकूण 15 जागांपैकी सर्वाधिक 5 जागा जिंकत शिवसेनेने बाजी मारली आहे. मात्र वणई गटातून शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांच्या चिरंजीवांचा झालेला दारूण प्रभाव हा शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे. दुसरीकडे पालघर जिल्ह्यात भाजप आणि मनसेने हातमिळवणी करत युती केली होती. मात्र, युतीचा हा प्रयत्न फसल्याचे स्पष्ट दिसून आहे. राष्ट्रवादीने 5, भाजपने 4, तर माकपने एका जागेवर विजय मिळविला. तर कॉंग्रेसला खाते उघडण्यात अपयश आले.