तया सर्वात्मका ईश्वरा । स्वकर्मकुसुमांची वीरा ।
पूजा केली होय अपारा । तोषालागी ।। 917 : 18 ।।
श्री ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायातील या ओव्यांमध्ये ज्ञानेश्वर माऊली म्हणत आहे की, “आपल्यापुढे जे काही कर्म आले आहे त्यामध्येच आपले अस्तित्व अवलंबून आहे (आपुला अनन्य वोलावा) आणि ती कर्मे करण्यातच सर्वांच्या आत्म्यात स्थित असलेल्या देवाची खरी सेवा घडते.
अरे अर्जुना, समोर आलेली कर्मे हे भगवंतांच्या इच्छेनेच आलेली असतात आणि म्हणून त्याच्यापाशी जायला हा एक राजमार्ग आहे कारण प्राप्त झालेली सर्वकर्मे त्याच्या इच्छेनेच आली आहेत.
या भावनेने केली (म्हणजे त्यालाच पूजा म्हणून अर्पण केली) तर त्या सर्वात्मक ईश्वराला अनावर आनंद होतो’. त्या अनावर आनंदाच्या भरात आत्मरुपी देव आपले नित्यनूतनरूप साधकाला क्षणोक्षणी दर्शवायला लागतो. साधकाच्या साधनेची पूर्तता व्हायला लागते!.