मुंबई – श्रीलंकेत भारताच्या दुसऱ्या संघाचे प्रशिक्षक म्हणून गेलेल्या राहुल द्रविड यांची आता भारतीय संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी नियुक्ती होण्याची शक्यता बळावली आहे. सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीच बीसीसीआयला आपला करार वाढवू नये अशी विनंती केल्याने द्रविडच्या मार्गातील अडचण दूर झाली असून या निमित्ताने कर्णधार विराट कोहलीच्या वर्तनावरही अंकूश येणार आहे.
शास्त्री व कोहली हे समिकरण संघासाठी लाभदायक होते. मात्र, त्यांना आयसीसीच्या एकाही स्पर्धेचे विजेतेपद मिळवता आले नाही. भारतीय संघ गेल्या काही वर्षांपासून सरस कामगिरी करत आहे. मात्र तरीही महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये संघाला अपयश आल्याने शास्त्री व कोहली टीकेचे धनी बनले.
राष्ट्रीय क्रिकेट अकादमीशी असलेला द्रविडचा करार नुकताच संपला असल्याने तो आता मुख्य प्रशिक्षकाच्या पदासाठी प्रयत्न करु शकतो आणि त्याची श्रीलंका दौऱ्यातील कामगिरी पाहता त्याला हे पद मिळू देखील शकते. द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाला भक्कम सेकंड बेंचही मिळाला. तरुण खेळाडूंना अकादमीत द्रविडच प्रशिक्षण देत होते. तसेच द्रविड भारताच्या 19 वर्षांखालील संघाचा तसेच अ संघाचा प्रशिक्षक असल्याने या सर्व नवख्या खेळाडूंसोबत बऱ्याच काळापासून काम करत आहे. त्यामुळे आता त्याला मुख्य प्रशिक्षक बनवण्याची मागणी जोर धरु लागली आहे.
दरम्यान, द्रविडचा बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीशी असलेला करार 2 वर्षांचा होता. मात्र, त्यात पुन्हा एकदा वाढही केली जाऊ शकते. अर्थात त्यासाठी द्रविडशी चर्चा केली जाणार आहे. श्रीलंका येथे सहा सामन्यांसाठी प्रशिक्षक असणाऱ्या द्रविड यांनी मात्र, अद्याप यावर बोलणे योग्य ठरणार नाही. सध्या माझ्याकडे जी जबाबदारी आहे ती व्यवस्थित पार पाडण्याला माझी पहिली पसंती आहे, असे मत द्रविडने व्यक्त केले आहे.