गुवाहाटी – हिंसाचार उफाळल्याने आसाम-मिझोरम सीमेवरील तणाव आणखीच वाढला आहे. अशात सोमवारी झालेल्या गोळीबारात आसामचे 6 पोलीस मृत्युमुखी पडले. त्या हिंसाचारात अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे दोन्ही राज्यांतील सीमेवर शांतता प्रस्थापित होण्याच्या उद्देशातून केंद्र सरकारला हस्तक्षेप करावा लागला आहे.
आसाम आणि मिझोरम ही राज्ये एकमेकांवर आपल्या हद्दीत अतिक्रमण करत असल्याचा आरोप करत आहेत. त्यातून जूनच्या अखेरपासून सीमेवर तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. सीमाभागात हिंसक घटना घडत आहेत.
यातच सोमवारी उसळलेल्या रक्तरंजित संघर्षात पाच पोलीस अधिकारी सहा पोलिसांचा मृत्यू झाला आहे. यात मूळचे महाराष्ट्रातील आणि सध्या कछरच्या पोलीस अधिक्षकपदी कार्यरत असलेले वैभव निंबाळकर जखमी झाले आहेत. निंबाळकर यांच्या पायाला गोळी लागली असून, त्यांना गंभीर दुखापत झाली आहे.
दरम्यान, या घटनेवेळी कचारा जिल्ह्यामध्ये निंबाळकर हे त्यांच्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसमवेत बंदोबस्तावर होते. यावेळी मिझोरमकडील नागरीकांनी आसाम पोलिसांच्या दिशेने गोळीबार व जोरदार दगडफेक केली. त्यामध्ये बंदोबस्तावर असणारे निंबाळकर यांच्या दोन सुरक्षारक्षकांना गोळ्या लागल्या. या गोळीबारादरम्यान निंबाळकर गंभीर जखमी झाले. सुदैवाने निंबाळकर यांच्या पायाला गोळी लागली आहे. त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती व्यवस्थित असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.