नवी दिल्ली – बहुतांश सर्व राज्यांमधील राज्य सरकारच्या शिक्षण विभागाचे दहावीचे निकाल जाहीर झाले असून अनेक ठिकाणी प्रवेश प्रक्रियाही सुरु झाली आहे. मात्र, केंद्रिय माध्यमिक परीक्षा विभागाचा (सीबीएसई) इयत्ता दहावीचा निकाल 20 जुलै रोजी जाहीर होणार, असे काही दिवसांपूर्वी सांगण्यात आले होते. तसेच बारावीचा निकाल 31 जुलै रोजी जाहीर केला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
मात्र, काल दि. 20 जुलै रोजी सीबीएसईचा निकाल जाहीरच न झाल्याने विद्यार्थी आणि पालकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे निकालाची तारीख आणि निकालाचे निकष ठरवण्यात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने सातत्याने चालढकल करत उलटसुलट माहिती सातत्याने दिली आहे.
दहावीचा निकाल 20 जुलै रोजी जाहीर केला जाईल, असेही बोर्डाने कळवले होते. मात्र काल लक्षावधी पालकांनी बोर्डाच्या वेबसाईटवर दिवसभर लक्ष ठेवले होते. कोणत्याही क्षणी निकालाची अपडेट येईल आणि आपल्याला विद्यार्थ्यांच्या करिअरची दिशा निवडता येईल, अशा आशेने अनेक शिक्षक, पालक आणि विद्यार्थी सातत्याने या वेबसाईटवर अपडेटस पहात होते.
मात्र, रात्री 11 पर्यंत या वेबसाईटवर (www.cbseresults.nic.in) कोणतीही निकालाची अपडेट आली नाही. इतकेच नव्हे तर दहावीचा निकाल नक्की केव्हा लागणार आहे, तो पुढे ढकलण्यात आला आहे का, असल्यास कोणत्या कारणामुळे याविषयीची माहिती दिली जाणे गरजेचे होते. मात्र, याबाबत काहीही माहिती अथवा परिपत्रक प्रसिद्ध न केले गेल्याने संभ्रमाचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नाव न छापण्याच्या अटीवर अनेक पालकांनी सांगितले की, सीबीएससी बोर्डाकडून वेळेत अधिकृत माहिती देण्याबाबर नेहमीच टाळाटाळ केली जाते आणि विद्यार्थी, पालकांसह शैक्षणिक संस्थांनाही अनेकदा गृहित धरले जाते.
एका संस्थाचालकाने सांगितले की, बोर्डाच्या संकेतस्थळावर काहीही माहिती न मिळाल्यास पालक आणि विद्यार्थी संस्थेत फोन करुन माहिती विचारतात. मात्र, त्याबाबत आम्हालाही कसलीही सूचना नसल्याने निष्कारण पालकांच्या रोषाला आम्हाला सामोरे जावे लागते.