नवी दिल्ली – उत्तर भारतातील उर्वरित भागात येत्या 10 जुलैपर्यंत मान्सून पोहचणार असल्याची माहिती हवामान खात्याने आज दिली. हवामान खात्याने म्हटले आहे की, मान्सून दक्षिण पेनिन्सुलात पुन्हा सक्रिय होत आहे.
बंगालच्या उपसागरात बहुतांशी भागात कमीदाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यातून निर्माण होणाऱ्या वाऱ्याच्या आधारे 10 जुलैपर्यंत हा पाऊस पंजाब आणि उत्तर हरियानात पोहोचेल. पश्चिम उत्तरप्रदेश, राजस्तान, दिल्ली परिसरातही मान्सुन या अवधीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
10 तारखेपासून उत्तर-पश्चिम भागात तसेच मध्यवर्ती भारतात चांगल्या पावसाला सुरूवात होईल असे संकेत आहेत. जून महिन्याच्या पहिल्या दोन-अडीच आठवड्यात चांगला पाऊस झाल्यानंतर उत्तर व मध्य भारतात मान्सून फार पुढे सरकू शकला नव्हता.
दिल्ली, हरियाना, पश्चिम उत्तरप्रदेश, पश्चिम राजस्थान, पंजाब या प्रांतात अजून मान्सूनचा पाऊस झालेला नाहीं.