नवी दिल्ली – मोदी सरकारच्या राजवटीत देशाची सर्वच क्षेत्रातील कामगिरी साफ निराशाजनक असून, सर्वच बाबतीत देश पार रसातळाला गेला आहे, अशी टीका कॉंग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. मोदी सरकारला आज सात वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी पत्रकार परिषद घेऊन या कामगिरीचे विश्लेषण सादर केले.
त्यावेळी त्यांनी ही टीका केली. या सात वर्षांच्या राजवटीत देशाने मानवता, आत्मनिर्भरता आणि विदेशातील आपला मान गमावला आहे. बेरोजगारी आणि महागाईने लोकांचे जगणे हराम झाले असून, गरीब आणि मध्यमवर्ग अत्यंत हालाकीच्या स्थितीत गेला आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे.
ते म्हणाले की, खोटी नोटबंदी, जीएसटीची माया, फरेब आणि जुमलोंकी छाया, गंगेत वाहणारी हजारो प्रेते, उन्नाव, प्रयागराज आणि कानपूरच्या मातीत दबलेले अश्रू, स्मशान घाटाच्या नव्याने उभारण्यात आलेल्या उंचच उंच आडोशाच्या आतील दुखाच्या कहाण्या, हे सारे चित्र मोदींच्या सात वर्षांच्या राजवटीत देशाने अनुभवले आहे.
देशवासियांनी असा भारत कधीच अपेक्षित धरला नव्हता. पण आज त्यांना हे सारे भोग मोदी सरकारमुळे वाट्याला आले आहेत. आम्ही सन 2014 साली देशाची सत्ता सोडली, त्यावेळी देशाचा विकास दर आठ टक्के होता तो आता उणे आठ टक्के इतका झाला आहे. गेल्या सात वर्षांत देशातील बारा कोटी 20 लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत.
मोदींच्या आश्वासनानुसार देशात चौदा कोटी रोजगार निर्माण होणे अपेक्षित होते, पण ते झाले तर नाहीच पण बेरोजगारीचा दर 45 वर्षांच्या नीचांकी पातळीवर गेला आहे. महागाईने केवळ गरीबच नव्हे तर मध्यमवर्गही कोलमडला आहे. मोहरीच्या तेलाचा दर दोनशे रूपयांच्या वर गेला असून, पेट्रोल शंभर रुपयांच्यावर गेले आहे.
यूपीए सरकारच्या दहा वर्षांत देशातील 27 कोटी लोकांना दारिद्य्ररेषेच्या बाहेर आणले गेले होते, पण मोदींच्या सात वर्षांच्या राजवटीत 23 कोटी लोक पुन्हा गरिबीच्या खायीत गेले आहेत. राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीतही मोदी सरकार अपयशी ठरले असून आज चीन अनेक ठिकाणी भारताची भूमी बळकावून बसला आहे. त्यामुळे मोदी सरकारला एकाही क्षेत्रात यश आलेले नाही, असे सुर्जेवाला यांनी म्हटले आहे.